महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, अहिल्यानगर:
महिला व बाल विकास विभागाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या आठव्या राष्ट्रीय पोषण पंधरवड्यात अहिल्यानगर जिल्ह्याने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार ९ एप्रिल ते २३ एप्रिल २०२६ या कालावधीत राबवल्या जाणाऱ्या जनजागृती उपक्रमांमध्ये अहिल्यानगर जिल्ह्याने देशात अव्वल स्थान प्राप्त केले आहे. जिल्ह्याने आतापर्यंत तब्बल ३ लाख २४ हजार ७५ उपक्रमांची नोंदणी करून ही मोठी झेप घेतली असून, या यादीत पुणे जिल्हा दुसऱ्या तर बिहारमधील मुझफ्फरपूर जिल्हा तिसऱ्या क्रमांकावर आहे.
या पोषण पंधरवड्याचा मुख्य उद्देश बालकाच्या आयुष्यातील पहिल्या सहा वर्षांतील मेंदूचा विकास हा असून, याच संकल्पनेवर आधारित विविध उपक्रम सध्या जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी केंद्रांमध्ये राबविले जात आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांच्या हस्ते जिल्हास्तरावर या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला होता. पहिल्या सहा वर्षांतील पोषण आणि शिक्षण हे बालकाच्या भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असल्याने या काळात मुलांच्या मेंदू विकासाकरिता पूर्व उद्दीपन, खेळ आधारित पूर्व शालेय शिक्षण आणि बालकांचा स्क्रीन वेळ कमी करणे यांसारख्या विषयांवर विशेष भर दिला जात असल्याची माहिती जिल्हा कार्यक्रम अधिकारी संजय कदम यांनी दिली आहे.
गाव पातळीवर हे अभियान यशस्वी करण्यासाठी आरोग्य, शालेय शिक्षण आणि ग्रामविकास या विभागांमध्ये उत्तम समन्वय पाहायला मिळत आहे. ग्रामपंचायत आणि अंगणवाडी स्तरावर मशाल फेरी, पाककृती स्पर्धा, पोषण रॅली, माता-बालक आरोग्य मार्गदर्शन शिबिरे आणि आहार प्रात्यक्षिके अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. या मोहिमेत स्थानिक नागरिक, पालक आणि महिलांचा उत्स्फूर्त सहभाग लाभत असून, बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी हे अभियान अधिक प्रभावीपणे राबवण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.






