कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या ‘शिवाजी कोण होता’, या पुस्तकावर आक्षेप घेणार्या बुलढाणातील आमदार संजय गायकवाड याने महाराष्ट्राची लाज शरमेने वाकवली आहे. छत्रपती शिवरायांचे कर्तेधर्ते आपणच असल्याचा आव आणत पुस्तकावरील आक्षेपाला ज्या शिवराळ भाषेत या आमदाराने उत्तरं दिली ती पाहिली की हा आमदार म्हणजे महाराष्ट्राला लागलेला कलंक आहे, असंच दिसतं. महाराष्ट्राची लाज घालवणार्या कितीजणांना सत्ताधारी पोसणार आहेत, हा खरा सवाल महाराष्ट्रातल्या जनतेला पडला आहे. सिंदखेड राजा या बुलढाणातील नावाजलेल्या ठिकाणची जहागीरदारी जणू या गायकवाडच्या घरचीच. शिवरायांच्या बालपणी स्वराज्याचं बीज ज्या जन्मस्थानी पेरलं त्या जिल्ह्यामधून असा आमदार आपण निवडून पाठवतो, याची लाज तिथल्या जनतेला वाटत असेल.
मुळात शिक्षणाची वाणवा असलेल्या या आमदाराला छत्रपती कोण होते, याची इतकीशीही माहिती असती तरी त्याने या विषयावर बोलायचंच टाळलं असतं. पण ज्याचं मस्तक पुस्तकापर्यंत पोहोचू शकत नाही, अशा व्यक्तीकडून काय अपेक्षा? बरं जे काही म्हणणं सौम्य शब्दात आणि आदराने संबंधितांपर्यंत पोहोचवणं काही गैर नाही. पण ज्याला शिवरायांच्या कोषात कुठेच स्थान नव्हतं अशा विकृत, गलिच्छ, नादान शब्दात या माणसाने आपली जीभ चालवली ती पाहाता हा माणूस विकृत असला पाहिजे याची खात्री पटते. एवढं करून तो थांबला नाही त्याने छत्रपतींच्या कौटुंबिक वारशाचा अधिकार सांगत घरात येऊन जिवे मारण्याची धमकी पुस्तकाच्या प्रकाशकाला दिली. इतकी हिंमत या माणसाकडे आली कुठून? महाराष्ट्राच्या बदलत्या परिस्थितीचा हा परिपाक होय. काहीही केलं तरी आमचं काही वाकडं होत नाही, याची खात्री या माणसांच्या डोक्यात घर करून आहे.
छत्रपती शिवरायांची अगदी कमी शब्दात बायोग्राफी मांडणार्या कॉम्रेड पानसरेंच्या ‘शिवाजी कोण होता’, या पुस्तिकेचं प्रकाशन करणार्या प्रशांत अंबी या तरुण प्रकाशकाला ज्या शब्दात आमदाराने धमकावलं ते कोणाही व्यक्तीला ऐकवलं जाणार नाही, इतक्या नीच पध्दतीचं होतं. या पुस्तिकेच्या एक दोन नव्हे आजवर ८२ आवृत्त्या प्रकाशित झाल्या आहेत. जागतिक मानांकनात सर्वाधिक वाचल्या जाणार्या मोजक्या पुस्तिकेत या पुस्तिकेचा समावेश झाला आहे. छत्रपती हे जननायक कसे, याचा उलगडा अगदी मोजक्या शब्दात मांडण्यात आल्याने त्याला वाचकांनी प्रचंड प्रतिसाद दिला आणि विक्रमी प्रकाशन करण्याची संधी अंबींसारख्या तरुणांना दिली. त्याच अंबी यांची जीभ हासडण्याची भाषा वापरून गायकवाडने आपल्यातला गावठी गुंड पुढे आणला आहे.
ज्या पुस्तकाचं लिखाण केलं म्हणून पानसरेंचा काटा काढण्यात आला त्या पानसरेंच्या मारेकर्यांचा पत्ता अजून सापडला नसताना मीच ते काम केल्याची उघड कबुली या माणसाने अंबी यांना अर्वाच्च शिविगाळ करताना दिलीच. पण तुलाही तिथे पाठवतो, असा दम भरला. अंबींच्या आई बहिणीवरून गायकवाडने दिलेल्या शिव्या इथे नोंदणं शक्य नाही, इतक्या त्या घृणास्पद आणि खालच्या दर्जाच्या आहेत. आमदार असलेला हा माणूस असली भाषा वापरू शकतो, याचंच आश्चर्य आहे. या माणसाने ही पुस्तिका वाचलीच नाही, हे त्यानेच कबूल केलंय. केवळ मथळ्यावरून पुस्तकाची पातळी ठरवली आणि घाण ओकली. छत्रपती असते तर त्यांनी याला यमसदनाच्या जन्मभर यातना दिल्या असत्या. राजांच्या सहवासातील आमची आठवी पिढी असल्याची मखलाशी मारताना या माणसाला आपल्या राजाची किती माहिती आहे, हा प्रश्नच आहे. सुभेदाराच्या सुनेला भरजारीने परत पाठवताना तिला आपल्या मातेची उपमा देणारे छत्रपती कुठे आणि आठव्या पिढीची ही अवलाद कुठे?
थोर छत्रपतींचा वारसा सांगण्याची लायकी नसलेली माणसंच महाराजांचे मारेकरी बनलेत. शिवरायांना जो जो मानतो त्या प्रत्येकाने या माणसावर अघोषित बहिष्कार टाकला पाहिजे. त्याला आपल्या कृत्याची जाणीव करून देण्याचा तोच एक मार्ग होय. शासकीय यंत्रणेकडून आणि सत्तेकडून आता कोणत्याही अपेक्षा राहिलेल्या नाहीत. उलट छत्रपती हा विषय हे सत्ताधारी आपल्या कलेने आणि राजकीय सोयीने घेत असतात. विधानसभेत इतरांना शहाणपण शिकवणारे छत्रपतींच्या भले आरत्या उतरत असतीलही. पण शिवरायांची अवहेलना करणार्यांना शिक्षा द्यावी, असं ह्यांना कधीच वाटलं नाही. ते वाटलं असतं तर छत्रपतींविषयी अश्लाघ्य बोलणार्या छिंदमसारख्या नालायक माणसाला तुरुंगात टाकलं असतं. प्रशांत परिचारक याच्या सारख्या उत्तान माणसाला कोठडीतील जागा दाखवून दिली असती. कोश्यारींसारख्या विकृत राज्यपालाचा निषेध म्हणून त्याला महाराष्ट्रातून घालवून दिलं असतं. नरेंद्र मोदींच्या डोक्यात छत्रपतींचा शिरटोप चढवणार्या प्रफुल्ल पटेल यांना जाब विचारला असता. शिवाजीने औरंगजेबाची पाचवेळ माफी मागितल्याचं खोटं सांगणार्या सुधांशू त्रिवेदीला कोर्टाच्या फेर्या घालायला लावल्या असत्या. शिवरायांवर एकेरी बोलण्याची खुमखुमी असलेल्या रावसाहेब दानवेना त्यांच्या कृत्याची जाणीव करून दिली असती. कोकणात राजकोट किल्ल्यावरचा छत्रपती शिवरायांचा ४० फुटी अश्वारूढ पुतळा आठव्या महिन्यात पडला. छत्रपतींच्या नावे भ्रष्टाचार करणार्यांविषयी सरकारची भूमिका लपून राहिली नाही. हे सारं पाहाता गायकवाड याच्यावर कारवाई करण्यासाठी ही सत्ता पुढाकार घेईल, यावर कोणाचा विश्वास नाही. याने आपल्या पक्षाचं नुकसान होतोय, हे लक्षात घेऊन स्वत:हून पुढाकार घेत एकनाथ शिंदे यांनी गायकवाडला घरी बसवण्याचा निर्णय घेतला पाहिजे. छत्रपतींचा बाणा दाखवण्याची हीच वेळ आहे. छत्रपतींवरील टीका सहन करणार नाही, हे दाखवून देण्याची वेळ आहे.
गायकवाड याचं हे पहिलं कृत्य नाही. गळ्यात वाघाच्या दाताचं लॉकेट घालताना मी वाघाची शिकार केली अशी मखलाशी हा गायकवाड मारायचा. वन्यप्राणी संरक्षण कायद्यान्वये सामान्यांचं जगणं महाग करणार्या यंत्रणेने वाघशिकार केल्याचं खुलेआम सांगणार्या या माणसावर कारवाई का केली नाही? आमदार निवासातील कॅन्टीनच्या वाढप्याला जेवण निकृष्ट असल्याचं कारण देत मारहाण केली. या गुंडगिरीनंतरही सत्तेने त्याच्या विरोधात कारवाई केली नाही. सत्ता मिळावी, तिचं संरक्षण व्हावं म्हणून विरोधकांवर साध्या तक्रारीचा आधार घेऊन छापेबाजी करणार्या ईडी आणि सीबीआयच्या नाकावर टिच्चून कार्यकर्त्यांच्या कल्याणासाठी ३५ कोटींचं कमिशन वाटतो, असं खुलेआम सांगणार्या या आमदाराविरोधात ईडी आणि सीबीआयला कारवाई का करावीशी वाटली नाही?
आरक्षणाच्या मुद्यावर राहुल गांधी यांची जीभ कापून आणणार्याला ११ लाखांचं बक्षीस या मुर्ख माणसाने लावलं होतं. राहुल गांधी हे खासदार आणि विरोधी पक्षाचे प्रमुख नेते असूनही महाराष्ट्राच्या सत्तेने त्याला साधा जाब विचारला नाही. महाराष्ट्राचे पोलीस ५० लाखांची जप्ती करून ५० हजार जमा करतात, अशी टिपण्णी करूनही गृह खात्याने त्याच्याकडून साधा खुलासा घेतला नाही. भोसले घराण्याची वारसदारी सांगणार्या या माणसाने संभाजी महाराजांनाही सोडलं नाही. राजांवर विकृत टीका केल्याने त्याच्यावर माफी मागण्याची वेळ आली होती.
ज्या मराठ्यांच्या नावाने हा सारा खेळ गायकवाड खेळतो त्या मराठा समाजानेही आता असल्या लोकप्रतिनिधीचा निपात करण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. जो येतो तो मराठा असल्याचं निमित्त करतो आणि छत्रपतींचा वारसदार म्हणून वाह्यात बोलून समाजाला बदनाम करत असेल तर तो कितीही मोठा असला तरी त्याला वठणीवर आणला पाहिजे. नाव छत्रपतींचं घ्यायचं हिंदू-मुस्लिमांमध्ये तेढ निर्माण होईल अशी आगलावी भाषा वापरणाऱ्यांची राज्यात कमी नाही. यात सत्ताधारी पुढारी, आमदार आणि मंत्र्यांचा भरणा अधिक. महाराजांच्या नावाचा ते सोयीने वापर करतात. कोणी आक्षेपार्ह बोललं की ते मौनी बनतात. महाराज हा विषय केवळ बोलण्यापुरता नाही तो जतन करून आचरणात आणण्याचा विषय आहे, हे गायकवाडने लक्षात घ्यावं.
प्रवीण पुरो, मुंबई
रविवार विशेष लेख — एकनाथराव, ह्या गायकवाडला घरी बसवा
प्रस्तुत लेखाचे लेखक प्रवीण पुरो हे दैनिक आपलं महानगरचे माजी निवासी संपादक असून मुंबईतील जेष्ठ पत्रकार व राजकीय विश्लेषक आहेत.






