संगमनेर: प्रतिनिधी
ज्यांनी अठरापगड जाती-धर्माच्या मावळ्यांना सोबत घेऊन रयतेचे स्वराज्य उभे केले, त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा दैदिप्यमान इतिहास आज काही विकृत मानसिकतेच्या लोकांमुळे काळवंडण्याचा प्रयत्न होत आहे. शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी ज्या खालच्या पातळीवर जाऊन शिवविचारांचा अपमान केला आहे, त्याला आता वैचारिक मार्गाने उत्तर देण्याचा निर्धार संगमनेरकरांनी केला आहे.
याच पार्श्वभूमीवर, रविवारी (२६ एप्रिल) सकाळी आठ वाजता संगमनेरच्या नेहरू गार्डनमध्ये कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकाचे सामूहिक वाचन करून शिवरायांचा खरा इतिहास जनमानसात मांडला जाणार आहे. या सामूहिक वाचनानंतर सकाळी १० वाजता संगमनेर बस स्थानक परिसरात गायकवाड यांच्या निषेधार्थ एल्गार पुकारला जाणार आहे.
सत्तेच्या गुर्मीत आणि अज्ञानाच्या अंधारात चाचपडणाऱ्या संजय गायकवाड यांनी ऐतिहासिक संदर्भांची मोडतोड करत या पुस्तकाबाबत अत्यंत गलिच्छ भाषा वापरली आहे. त्यांच्या या बेताल वक्तव्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली असून, शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. समाजासमाजात तेढ निर्माण करून आपली राजकीय पोळी भाजणाऱ्या अशा प्रवृत्तींचा मुखभंग करण्यासाठी महाविकास आघाडीसह सर्व पुरोगामी संघटना एकवटल्या आहेत.
शिवरायांच्या सैन्यात मुस्लीम समाजातील शूरवीर होते, त्यांनी सर्वांना समान न्याय दिला, हाच खरा इतिहास पानसरे यांनी आपल्या पुस्तकातून मांडला आहे. हा इतिहास पुसण्याचे कारस्थान सुरू असल्यानेच ‘वाचनातून विचार आणि विचारातून परिवर्तन’ हे ब्रीद घेऊन संगमनेरमधील सर्व राजकीय पक्ष, सामाजिक संस्था, महिला आणि युवक संघटना रस्त्यावर उतरल्या आहेत.
नेहरू गार्डन येथील वाचनानंतर शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन करून या वैचारिक क्रांतीची मशाल पेटवली जाणार आहे. या आंदोलनात संगमनेरकरांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन शिवरायांच्या बदनामीचा हा प्रयत्न हाणून पाडावा, असे आवाहन करण्यात आले आहे.






