महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर:
संगमनेर तालुक्यासह राज्यभरात सध्या जंगलांना लागणाऱ्या आगींचे सत्र सुरू असून, यामुळे पर्यावरणाची मोठी हानी होत आहे. या गंभीर घटना रोखण्यासाठी प्रशासनाकडून कोणत्याही ठोस किंवा समाधानकारक उपाययोजना केल्या जात नसल्याचा थेट आरोप माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी केला आहे.
मालदाड परिसरात नुकत्याच लागलेल्या भीषण आगीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी आपली तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. वारंवार लागणाऱ्या वणव्यांमुळे केवळ झाडेच जळून खाक होत नसून वन्यजीवांचेही अतोनात नुकसान होत आहे. या परिस्थितीमुळे पर्यावरणप्रेमी आणि नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर नैराश्य पसरले आहे. आपण ‘दंडकारण्य अभियाना’च्या माध्यमातून वृक्षलागवड आणि पर्यावरण संवर्धनासाठी रात्रंदिवस कष्ट घेत आहोत. मात्र, जर अशाच प्रकारे मानवनिर्मित किंवा नैसर्गिक आगींमुळे ही झाडे जळून जाणार असतील, तर ‘झाडे लावायची तरी कशाला?’ असा उद्विग्न सवाल डॉ. तांबे यांनी प्रशासनाला विचारला आहे.
जंगलांना लागणाऱ्या आगीची ही समस्या केवळ संगमनेर तालुक्यापुरती मर्यादित राहिलेली नाही. नाशिक जिल्ह्यातील पेठ आणि कळवण यांसारख्या दुर्गम तालुक्यांमध्येही मोठ्या प्रमाणावर वणवे लागत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. मालदाड येथील डोंगराला लागलेल्या आगीवेळी स्थानिक सरपंच आणि नागरिकांनी ती विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले, मात्र प्रशासकीय मदतीअभावी ते हतबल झाल्याचे चित्र पाहायला मिळाले, असेही त्यांनी नमूद केले.
वनविभागाने केवळ वृक्षलागवडीचे उद्दिष्ट न ठेवता, लावलेली झाडे जगवण्यासाठी आणि वणव्यांपासून त्यांचे संरक्षण करण्यासाठी प्रभावी यंत्रणा कार्यान्वित करणे आवश्यक आहे. आगी लागण्यामागची नेमकी कारणे शोधून त्यावर तातडीने उपाययोजना करण्याची गरज असल्याचे डॉ. तांबे यांनी स्पष्ट केले. या गंभीर प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी ते लवकरच राज्याच्या वनमंत्र्यांना सविस्तर निवेदन सादर करणार असून, राज्यभरातील जंगलांचे संरक्षण करण्यासाठी शासनाने तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी त्यांनी केली आहे.






