महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन:
महाराष्ट्रात ‘दैवी शक्ती’ आणि ‘चमत्काराच्या’ नावाखाली सुरू असलेला अंधश्रद्धेचा बाजार पोलिसांनी उखडून टाकण्यास सुरुवात केली आहे. नाशिकमधील कुख्यात भोंदू अशोक खरात याच्या अटकेनंतर संपूर्ण राज्यात खळबळ माजली असून, गेल्या ३० दिवसांत पोलिसांनी राज्यातील विविध जिल्ह्यांतून एकूण १४ भोंदू बाबांना गजाआड केले आहे.
गजाआड केलेल्या या भोंदूंचे अनेक प्रताप पोलीस तपासात समोर येत आहे. या भोंदूनी महिलांचे लैंगिक शोषण आणि कोट्यवधींची आर्थिक फसवणूक केल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. नाशिकच्या अशोक खरातवर आतापर्यंत १० गुन्हे दाखल झाले आहेत. त्याने महिलांचे शोषण करण्यासाठी गुंगीकारक पदार्थांचा वापर केल्याची कबुली दिली असून, सध्या SIT (विशेष तपास पथक) या प्रकरणाचा सखोल तपास करत आहे.
खरातच्या अटकेनंतर राज्यात एकामागून एक भोंदू बाबांच्या अटकेचे सत्र सुरू झाले असून राज्याच्या कानाकोपऱ्यातून पोलिसांनी शोधून काढलेल्या या भोंदूंची यादी मोठी आहे.
अशोक कुमार खरात (नाशिक)
विठोबा वाल्मीक जाट (सातपूर)
महेशगिरी ऊर्फ महेश काकडे (निफाड)
पंकज देवराम घोलप (येडगाव)
नाना बर्डे (आळे फाटा)
किसन तळपे मंदोशी (खेड)
मनोहर मामा भोसले (कुरुडवाडी, सोलापूर)
ऋषिकेश वैद्य (वसई)
अल्ताफ रईस खान (मालाड)
रिधम पांचाळ (मालाड)
अर्जुन चव्हाण ऊर्फ ‘टनटन बाबा’ (नवी मुंबई)
राजेंद्र गडगे ऊर्फ गडगेबाबा (संगमनेर)
गणेश शिंदे (श्रीरामपूर)
अकोल्यातील चेतन सुनील माळी (मूर्तिजापूर)
पीडितांनो, न घाबरता पुढे या – ‘अनिस’चे आवाहन…
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्याध्यक्ष संजय बनसोडे यांनी यावर चिंता व्यक्त केली आहे. अनेक महिला सामाजिक प्रतिष्ठेमुळे तक्रार करण्यास पुढे येत नाहीत. मात्र, या भोंदूंचा मुळासकट नायनाट करण्यासाठी महिलांनी न घाबरता पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.






