संगमनेर | प्रतिनिधी
संगमनेर तालुक्यात कत्तलखान्यांचे रॅकेट पुन्हा एकदा सक्रिय झाले असून, पोलीस उपअधीक्षकांच्या पथकाने धडक कारवाई करत गोवंशाची अवैध वाहतूक करणारा आयशर टेम्पो पकडला आहे. वडगाव पान ते तळेगाव रोडवर हॉटेल अमर जवळ ही कारवाई करण्यात आली. यामध्ये तब्बल दोन मृत बैलांसह २९ जनावरांची सुटका करण्यात आली असून, २३ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मात्र, पोलिसांना पाहताच चालकाने अंधाराचा फायदा घेऊन पळ काढला.
उपविभागीय पोलीस अधिकारी कुणाल सोनवणे यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही धडक मोहीम राबवण्यात आली. सोमवारी रात्री एका विटकरी रंगाच्या आयशर टेम्पोमधून (क्र. PB 05 L 4157) जनावरांना अत्यंत निर्दयीपणे दाटीवाटीने भरून कत्तलीसाठी मालेगावच्या दिशेने नेले जात होते. खाकी वर्दीने सापळा रचल्याचे लक्षात येताच चालकाने महामार्गावरच वाहन सोडून धूम ठोकली.
पोलिसांनी जेव्हा टेम्पोची ताडपत्री उघडली, तेव्हा पोलीस पथकाला आतील दृश्य बघून धक्का बसला. कत्तलखान्याकडे नेल्या जाणाऱ्या २९ बैलांपैकी २ बैल गुदमरून मृत अवस्थेत सापडले. उरलेल्या २७ जनावरांना तात्काळ जीवदया गोरक्षण संस्था, सायखिंडी येथे सुरक्षित हलवण्यात आले आहे. १५ लाखांचा टेम्पो आणि ८ लाखांची जनावरे असा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.
पोलीस कॉन्स्टेबल राहुल सारबंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चालकाविरुद्ध प्राण्यांना निर्णय देणे वागणूक देणे अधिनियम ३,११ तसेच महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत बापू हांडे, सुनील ढाकणे आणि पथकाने सहभाग घेतला. या तस्करीमागे मोठे रॅकेट असण्याची शक्यता असून, फरार चालकाचा, तसेच हे गोवंश कत्तलीसाठी कोण नेत होते, यात कोणाचा समावेश होता, याचा शोध पोलीस घेत आहेत.






