महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन | संगमनेर:
देशाच्या प्रगतीसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या भारतीय जनगणनेच्या प्रक्रियेला सुरुवात झाली असून, यावेळी प्रथमच संपूर्णतः डिजिटल पद्धतीने ही गणना केली जात आहे. या पार्श्वभूमीवर संगमनेर तालुक्यात प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असून प्रगणक आणि पर्यवेक्षकांना विशेष प्रशिक्षण दिले जात आहे. विशेष म्हणजे, यंदा नागरिकांना प्रगणकाची वाट न पाहता स्वतःहून आपली माहिती नोंदवण्याची संधी ‘स्व-जनगणना’ (सेल्फ इन्युमरेशन) माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आली आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी या सुविधेचा लाभ घेऊन राष्ट्रीय कार्यात सहभाग नोंदवावा, असे आवाहन संगमनेरचे तहसीलदार तथा जनगणना अधिकारी धिरज मांजरे यांनी केले आहे.
तालुक्यातील जनगणनेच्या कामकाजासाठी महसूल विभागाने स्वतंत्र कक्ष कार्यान्वित केला असून, तहसीलदार स्वतः चार्ज अधिकारी म्हणून यावर देखरेख ठेवत आहेत. त्यांना जनगणना लिपिक धनंजय गायवळ आणि तंत्रज्ञान सहाय्यक गणेश सोनवणे तांत्रिक सहकार्य करत आहेत.
सध्या तालुक्यात तीन टप्प्यांत शिक्षकांना प्रशिक्षण दिले जात असून, त्यापैकी दोन टप्पे यशस्वीरित्या पूर्ण झाले आहेत. एकूण ६७२ प्रगणक आणि ११२ पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आली असून, आपत्कालीन स्थितीसाठी १० टक्के अतिरिक्त कर्मचाऱ्यांनाही प्रशिक्षित करून ठेवण्यात आले आहे. एका प्रगणकावर साधारणपणे १८० ते २०० कुटुंबांच्या सर्वेक्षणाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
जनगणनेचा हा पहिला टप्पा दोन भागांत विभागला गेला आहे. १ मे ते १५ मे या कालावधीत नागरिक https://se.census.gov.in या संकेतस्थळावर जाऊन स्वतःच्या घराची आणि कुटुंबाची माहिती भरू शकणार आहेत. त्यानंतर १६ मे ते १४ जून या काळात प्रगणक प्रत्यक्ष घरोघरी जाऊन माहिती संकलित करतील. या पहिल्या टप्प्यात मुख्यत्वे घरांची गणना केली जाणार असून, जनगणनेचा दुसरा टप्पा फेब्रुवारी २०२७ मध्ये पार पडणार आहे.
स्व-जनगणना करताना नागरिकांना कुटुंबातील प्रमुखाचे नाव, लिंग, घराचे बांधकाम, छताचा प्रकार, उपलब्ध स्वच्छतागृह, पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत, वीज सुविधा, सांडपाणी व्यवस्थापन, स्वयंपाकाचे इंधन तसेच घरातील मोबाईल, रेडिओ, टीव्ही, इंटरनेट, संगणक, सायकल आणि वाहने यांसारख्या भौतिक साधनांची सविस्तर माहिती नोंदवावी लागणार आहे. ही सर्व माहिती पूर्णपणे गोपनीय राखली जाणार असून ती कोणत्याही परिस्थितीत त्रयस्त व्यक्तीला उपलब्ध करून दिली जाणार नाही, अशी ग्वाही प्रशासनाने दिली आहे. त्यामुळे नागरिकांनी निर्भयपणे आणि अचूक माहिती नोंदवावी, असे सूचित करण्यात आले आहे.
क्षेत्रफळानुसार संगमनेर शहरात सर्वाधिक १३५ प्रगणक कार्यरत असतील, तर घुलेवाडी ग्रामपंचायत क्षेत्रात ५७ आणि गुंजाळवाडी भागात २२ प्रगणकांची नियुक्ती करण्यात आली आहे. सर्वेक्षणासाठी शासनाकडून नकाशे आणि डिजिटल साधने पुरवण्यात आली असून, आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरामुळे यावेळची जनगणना अधिक अचूक आणि पारदर्शक होईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे.






