महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर:
सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याने चालू हंगामात १ कोटी ४० लाख लिटर इथेनॉल निर्मितीचा टप्पा यशस्वीपणे पूर्ण केला आहे. या विशेष कामगिरीनिमित्त आयोजित कार्यक्रमात राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात बोलत होते. जागतिक पातळीवर युद्धाच्या परिस्थितीमुळे निर्माण झालेला इंधनाचा तुटवडा पाहता, इथेनॉल हा भविष्यातील इंधनासाठी एक सक्षम आणि सर्वोत्तम पर्याय असल्याचे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.
बाळासाहेब थोरात पुढे म्हणाले की, सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या आदर्श शिस्तीवर आणि विचारांवर कारखान्यासह सर्व संस्थांची वाटचाल अत्यंत पारदर्शकपणे सुरू आहे. राज्यातील अनेक सहकारी कारखान्यांमध्ये अल्कोहोलपासून दारूची निर्मिती केली जाते, मात्र थोरात कारखान्याने आपली सामाजिक बांधिलकी जपत दारू निर्मितीऐवजी इंडस्ट्रियल अल्कोहोल आणि इथेनॉल निर्मितीवर भर दिला आहे.
सध्याच्या काळात वीज निर्मिती आणि इथेनॉल प्रकल्प हे साखर कारखान्यांच्या आर्थिक स्थैर्यासाठी मोठी मदत करत आहेत. कारखान्याने कायमच शेतकऱ्यांना उच्चांकी भाव देण्याची परंपरा जोपासली असून सांघिक प्रयत्नातूनच हे यश साध्य झाले आहे.
याप्रसंगी त्यांनी केंद्र सरकारकडे महत्त्वाची मागणीही केली. देशात पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या टंचाईवर इथेनॉल हा प्रभावी मार्ग असल्याने, इथेनॉल निर्मिती करणाऱ्या सहकारी साखर कारखान्यांसाठी केंद्र सरकारने रास्त भाव निश्चित करून देणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाला माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, कारखान्याचे व्हाईस चेअरमन पांडुरंग पाटील घुले, युवक काँग्रेसच्या अध्यक्ष डॉ. जयश्रीताई थोरात, संचालक संपतराव गोडगे, सतीश वर्पे, विलास शिंदे, रामनाथ कुटे, विजय राहणे, गुलाबराव देशमुख, अरुण वाकचौरे, अंकुश ताजणे, मदन आंबरे, लताताई गायकर, हौशीराम सोनवणे यांच्यासह कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर, सेक्रेटरी किरण कानवडे आणि विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जगन्नाथ घुगरकर यांनी केले, तर उपस्थितांचे आभार पांडुरंग पाटील घुले यांनी मानले. या सोहळ्यासाठी कारखान्याचे अधिकारी, कर्मचारी आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.






