हिंदूहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख तथा जागतिक कीर्तीचे व्यंगचित्रकार वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त संगमनेर शहर शिवसेनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेली भव्य व्यंगचित्रकला स्पर्धा मोठ्या उत्साहात आणि दिमाखात पार पडली. या अनोख्या उपक्रमाला परिसरातील विद्यार्थी, शिक्षक, पत्रकार तसेच हौशी व्यंगचित्रकारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन कोते पाटील यांनी व्यंगचित्रांचे महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले की, व्यंगचित्राच्या माध्यमातून शेतकरी, महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचार यांसारख्या ज्वलंत विषयांवर अचूक भाष्य करता येते. एक प्रभावी व्यंगचित्र हजारो लोकांच्या समस्यांना थेट वाचा फोडण्याचे काम करते, हाच बाळासाहेबांचा खरा वारसा आहे.
तर विधानसभा संपर्कप्रमुख सूर्यकांत शिंदे यांनी सर्व स्पर्धकांच्या कलागुणांचे कौतुक करत, स्पर्धेतील निवडक आणि उत्कृष्ट व्यंगचित्रे दै. ‘सामना’मध्ये प्रसिद्ध करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही यावेळी दिली.
शिवसेना उपजिल्हाप्रमुख अमर कतारी यांनी बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा देत सांगितले की, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे केवळ एक प्रभावी राजकीय नेते नव्हते, तर त्यांच्या कुंचल्यातून उमटणाऱ्या व्यंगचित्रांनी समाजमनावर खोल प्रभाव निर्माण केला होता. त्यांच्या व्यंगचित्रांमधून सामाजिक व राजकीय परिस्थितीवर अतिशय मार्मिक भाष्य केले जात असे. त्यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या याच कलात्मक वारशाला अभिवादन करण्यासाठी संगमनेर शहर शिवसेनेने या स्पर्धेचे आयोजन केले आहे.
सदर स्पर्धा ‘विद्यार्थी गट’ व ‘खुला गट’ अशा दोन वेगवेगळ्या विभागांत घेण्यात आली होती. यामध्ये विविध क्षेत्रांतील स्पर्धकांनी उत्साहाने सहभाग घेत आपल्या कुंचल्याच्या माध्यमातून सामाजिक, राजकीय आणि समकालीन विषयांवर अतिशय प्रभावी व्यंगचित्रे साकारली. देशातील वाढती महागाई, इंधन दरवाढ तसेच केंद्र व राज्य शासनाच्या विविध धोरणांवर आधारित काढण्यात आलेली मार्मिक व्यंगचित्रे सर्वांचे विशेष लक्ष वेधून घेत होती.
या स्पर्धेचे परीक्षण प्रकाश पारखे सर आणि सोमवंशी सर यांनी केले. अशी स्पर्धा दरवर्षी आयोजित करण्यात यावी, अशी इच्छाही परीक्षकांनी यावेळी व्यक्त केली.
संगमनेर शहरप्रमुख अमित चव्हाण व फैसल सय्यद आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या स्पर्धेचे नेटके नियोजन केले होते. या यशस्वी आयोजनाबद्दल उपस्थित वरिष्ठ नेत्यांनी सर्वांचे विशेष कौतुक केले. या कार्यक्रमाला श्रीरामपूर जिल्हाप्रमुख जगदीश चौधरी, तालुकाप्रमुख भिमाशंकर पावसे, विधानसभा प्रमुख योगेश खेमनर, जिल्हा संघटक रवींद्र कानकाटे, विधानसभा संघटक दीपक साळुंके, बाळासाहेब घोडके, युवासेना जिल्हाप्रमुख अक्षय गुंजाळ, महिला आघाडीच्या आशा केदारी, संगीता गायकवाड, वैशाली वड्डतले आणि राजश्री रहाणे उपस्थित होत्या.
तसेच आसिफभाई तांबोळी, अमोल डुकरे, संभव लोढा, कैलास गायके, अभिषेक साबळे, सचिन साळवे, अशोक बढे, राजू सातपुते, प्रकाश गायकवाड, गोविंद नागरे, त्र्यंबक शिंदे, रहिम बेग, अल्ताफ शेख, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे संकेत ऐखंडे यांच्यासह मोठ्या संख्येने स्पर्धक, विद्यार्थी, पालक आणि शिवसैनिक उपस्थित होते.