नाशिक पदवीधरचे माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांना मानाचा ‘साने गुरुजी जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर; उद्या पुण्यात होणार गौरव
आमदार म्हणून कार्यरत असताना त्यांनी शिक्षण, कृषी, सहकार, वकील, डॉक्टर आणि बेरोजगार पदवीधरांच्या प्रश्नांवर सभागृहात सातत्याने आवाज उठवला आणि ते तडीस नेले.



येत्या ४ जून २०२६ रोजी पुणे येथे आयोजित एका दिमाखदार सोहळ्यात डॉ. तांबे यांना हा पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. पेशाने एम. एस. सर्जन असलेले डॉ. सुधीर तांबे यांनी केवळ वैद्यकीय सेवाच केली नाही, तर संगमनेरचे नगराध्यक्ष पद सांभाळताना पालिकेच्या कारभाराला एक नवी आणि लोकाभिमुख दिशा दिली. सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या आदर्श विचारांचा वारसा जपत आणि ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी संगमनेरच्या सहकार, समाजकारण, शिक्षण आणि क्रीडा क्षेत्रात आपले स्वतंत्र स्थान निर्माण केले. तरुणांना संघटित करून निरोगी समाज घडवण्यासाठी त्यांनी ‘जयहिंद युवा मंच’ची स्थापना केली, तर समाजातील वंचित, मतिमंद व मूकबधिर मुलांच्या शिक्षणासाठी ‘संग्राम मतिमंद विद्यालय’ उभे करून संवेदनशील सामाजिक जाणिवांचा परिचय दिला.

अहिल्यानगर, नाशिक, धुळे, जळगाव आणि नंदुरबार अशा पाच जिल्ह्यांतील ५४ तालुक्यांमध्ये डॉ. तांबे यांनी दांडगा जनसंपर्क निर्माण केला आहे. ‘सहज उपलब्धता आणि थेट संवाद’ ही त्यांची ओळख असून, लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी जनतेचे प्रश्न सोडवले आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणात ‘नेता नव्हे मित्र’ अशी ख्याती मिळवलेले डॉ. तांबे हे आपल्या आदिवासी आणि गोरगरीब बांधवांबद्दलची तळमळ, विज्ञानवादी दृष्टिकोन आणि साहित्याची आवड यासाठी ओळखले जातात.