महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर:
माजी मंत्री, लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने विविध विकासाच्या योजना राबवून अत्यंत वैभवशाली व सुरक्षित शहर म्हणून संगमनेरची राज्यात ओळख निर्माण झाली आहे. मात्र, मागील काही दिवसांपासून महावितरण कार्यालयाकडून भारनियमनाच्या नावाखाली सातत्याने अनियमित आणि खंडित वीजपुरवठा केला जात आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिक कमालीचे त्रस्त झाले असून शहरासह ग्रामीण भागात तीव्र संताप व्यक्त होत आहे. वीजपुरवठा तातडीने सुरळीत करावा या मागणीसाठी शुक्रवारी संतप्त नागरिकांनी महावितरण कार्यालयावर धडक मोर्चा काढून प्रशासनाला निवेदन दिले.
हे आंदोलन संगमनेर तालुका युवक काँग्रेसच्या अध्यक्षा डॉ. जयश्रीताई थोरात यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अजय फटांगरे, अर्चनाताई बालोडे, निखिल पापडेजा, वैष्णव मूर्तडक, गुंजाळवाडीचे सरपंच अमोल गुंजाळ, आनंद वर्पे, शेखर सोसे, शितल उगलमुगले, उज्वला राहणे, ज्योती पवार, प्रीतम साबळे, डॉ. विजय पवार, सागर पावसे, दीपक शिंदे, अनिल घुगे, चंद्रकांत घुगे, निलेश सांगळे, भाऊसाहेब सांगळे, सागर सांगळे, जयप्रकाश मंडलिक, विशाल घुगे, नामदेव सोनवणे, रमेश काकड, आयान शेख, गौरव पेंडभाजे, दत्तात्रय गळंगे, आनंद वर्पे, तात्या कुटे आणि सोमनाथ जोंधळे यांच्यासह इतर अनेक पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महावितरणचे कार्यकारी अभियंता प्रदीप वट्टमवार यांनी आंदोलनकर्त्यांचे निवेदन स्वीकारले आणि या समस्येवर तातडीने उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले. हिंस्र प्राण्यांची भीती अन् शेतकरी हैराण आंदोलकांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, संगमनेर तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये सध्या दररोज सायंकाळी ६ ते रात्री ९ या वेळेत विद्युत पुरवठा खंडित केला जातो. पावसाळ्याचे दिवस असल्याने सध्या लवकर अंधार पडतो, त्यातच ही वेळ विद्यार्थ्यांची शाळेतून घरी परतण्याची असते. अंधारामुळे रस्त्यांवर हिंस्र प्राण्यांचा वावर वाढल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच वीज नसल्याने विद्यार्थ्यांना अभ्यासात अडथळे येत आहेत. दुसरीकडे, दूध उत्पादक शेतकऱ्यांना गोठ्यामध्ये गाई-म्हशींचे दूध काढणे आणि स्वच्छतेची कामे अंधारातच करावी लागत आहेत. या अघोषित लोडशेडिंगमुळे केवळ शेतकरीच नव्हे, तर व्यापारी, उद्योजक आणि सामान्य नागरिकांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. प्रशासनाने संध्याकाळच्या वेळी वीज खंडित करू नये आणि या समस्येवर तातडीने तोडगा काढावा, अशी मागणी करण्यात आली आहे. खंडित होणारा वीज पुरवठा ही चिंतेची बाब: डॉ. जयश्रीताई थोरात
मागील अनेक दिवसांपासून संगमनेर शहरासह ग्रामीण भागामध्ये विजेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. तालुक्यात वीजपुरवठा अत्यंत कमी दाबाने आणि अनियमित सुरू असून महावितरण या गंभीर बाबीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. महावितरणच्या अधिकाऱ्यांकडे याबाबत विचारणा केली असता त्यांच्याकडून कोणतीही ठोस किंवा समाधानकारक कारणे दिली जात नाहीत, हे अत्यंत चुकीचे आहे. महावितरणने यावर तातडीने मार्ग काढावा, अन्यथा तालुक्यातील जनता रस्त्यावर उतरून महावितरण कार्यालयाविरोधात याहून तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडेल, असा इशारा डॉ. जयश्रीताई थोरात यांनी यावेळी दिला.