अमोल शेलकर अयोध्या राम मंदिराची उभारणी हा कोट्यवधी हिंदूंच्या श्रद्धेचा आणि अस्मितेचा विषय आहे. देश-विदेशातून सामान्य नागरिकांनी आपल्या कष्टाची कमाई या मंदिरासाठी दान केली. परंतु, गेल्या काही दिवसांत समोर आलेले मीडिया रिपोर्ट्स, मंदिराचे माजी कर्मचारी आणि स्थानिक साधू-संतांचे दावे पाहिले तर या श्रद्धेला भ्रष्टाचाराचे ग्रहण लागल्याचे दिसून येत आहे. या प्रकरणाचा आढावा घेतल्यास दोन मुख्य प्रकारच्या गंभीर गडबडी समोर येतात, ज्यामध्ये पहिली पैशांच्या व दागिन्यांच्या चोरीची आणि दुसरी जमीन खरेदीतील कोट्यवधींच्या घोटाळ्याची आहे.
राम मंदिरामध्ये भक्तांची प्रचंड गर्दी असते आणि तिथे एकूण ३५ दानपेट्या ठेवण्यात आल्या आहेत. या पेट्या भरल्यानंतर त्यातील दान सुरक्षित लोखंडी पेट्यांमध्ये साठवले जाते आणि तिथून अवघ्या २०० मीटर अंतरावर असलेल्या तीर्थ यात्री केंद्राच्या तळघरात मोजणीसाठी आणले जाते. मंदिरात दररोज सरासरी १० ते १२ लाख रुपये जमा होतात, तर सणासुदीच्या काळात हा आकडा ५० ते ६० लाखांच्या वर जातो. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट या नावाने असलेल्या खात्यात हे पैसे दुसऱ्या दिवशी जमा केले जातात. सदर ट्रस्टवर १५ लोकांची नेमणूक असून त्यातील ६ धार्मिक तर ९ पंतप्रधान नरेंद्र मोदींचे निकटवर्तीय आहेत. ट्रस्टचे अध्यक्ष माजी मुख्य सचिव नृपेंद्र मिश्रा आहेत. राम मंदिर ट्रस्टच्या नियुक्त्या आत्ताचे निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी सुचवलेल्या आहेत.
अकाउंटंट महिपाल सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, नोटा मोजताना खाजगी एजन्सीच्या मदतीने १० बंडलांऐवजी १३ बंडलांचा एक मोठा बंडल तयार करून पैशांची थेट हेराफेरी केली जात होती. जेव्हा त्यांनी हा प्रकार ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय आणि अध्यक्ष नृत्य गोपाल दास यांच्या कानावर घातला, तेव्हा त्यांनाच पदावरून हटवण्यात आले आणि मागील काळातील सर्व महत्त्वाचे सीसीटीव्ही फुटेज डिलीट करून पुरावे नष्ट करण्यात आले. तसेच, दानपेट्यांमध्ये भक्त केवळ रोख रक्कमच नाही तर सोन्या-चांदीचे दागिनेही अर्पण करतात, मात्र मोजणी फक्त रोख पैशांची दाखवून सोन्या-चांदीचे दागिने चंपत राय यांचा ड्रायव्हर आणि त्यांचा खास माणूस असलेला राम शंकर यादव (टिन्नू यादव) याच्याकडे सोपवले जायचे.
यामध्ये शिवसेनेने दिलेले १ कोटी रुपये आणि २५ किलोची चांदीची वीट, तसेच अनिल विश्वकर्मा नावाच्या भक्ताने दिलेला ३ किलो चांदीचा हार आणि १ किलोच्या चांदीच्या पादुका टिन्नू यादवने गायब केल्याचा आरोप आहे. इतकेच नाही तर, दोन वर्षांपूर्वी प्रभू श्रीराम आणि त्यांच्या तीन भावांचे चोरीला गेलेले सोन्याचे मुकुट एका ट्रस्टीच्या कपाटात सापडले होते, जे एका भक्ताने स्वतःच्या पत्नीचे व आईचे दागिने मोडून बनवले होते.
या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन स्टेट बँकेने देखील तक्रार केली होती. तीन महिन्यांपूर्वी टिन्नू यादवला हटवण्याचे प्रयत्न झाले, पण चंपत राय यांनी ते हाणून पाडले. या गैरव्यवहारातून टिन्नू यादवकडे ५० कोटींची तर के. डी. तिवारी याच्याकडे ५ कोटींची अवैध संपत्ती जमा झाल्याचा संशय आहे. उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या एका ट्विटमुळे हा संपूर्ण प्रकार उजेडात आला आणि त्यानंतर सुभाष श्रीवास्तव, अविनाश शुक्ला, लवकुश मिश्रा, मनीष यादव या कर्मचाऱ्यांसह टिन्नू यादवला अटक करण्यात आली आहे.
‘दैनिक भास्कर’ आणि इतर शोधपत्रकारितेच्या अहवालानुसार, राम मंदिर ट्रस्टशी संबंधित लोकांनी मंदिराच्या आजूबाजूची जमीन खरेदी करताना प्रचंड नफेखोरी केली आहे. यात सामान्य माणसाच्या पैशांची कशी लूट झाली, याचे एक उदाहरण म्हणजे सुलतान अन्सारी आणि मोहन तिवारी नावाच्या व्यक्तींनी जी जमीन अवघ्या २ कोटी रुपयांना खरेदी केली होती, तीच जमीन अवघ्या १० मिनिटांनंतर राम मंदिर ट्रस्टला १८ कोटी रुपयांना विकण्यात आली. म्हणजे अवघ्या काही मिनिटांत किमती १७ पटीने वाढवून ट्रस्टच्या पैशांची उधळपट्टी करण्यात आली.
या जमीन व्यवहारांमध्ये चंपत राय यांचा पुतण्या चंदन राय याची मुख्य भूमिका होती, जो मंदिर बनण्यापूर्वी अयोध्येत भाड्याच्या खोलीत राहायचा आणि आज त्याच्याकडे अयोध्येत कोट्यवधीची जमीन व हरिद्वारमध्ये स्वतःचे हॉटेल्स आहेत. याशिवाय, मीडिया रिपोर्ट्सनुसार मुख्य मंदिराच्या बांधकामासाठी लागणारी माती, वाळू, सिमेंट, स्टील आणि मजूर पुरवठा या सर्वच स्तरांवर तब्बल ४० टक्क्यांपर्यंत कमिशनखोरी झाली आहे.
या संपूर्ण प्रकरणाची माहिती आधीच उच्च पातळीवर उपलब्ध होती, तरीही त्यावर पांघरूण घालण्याचा प्रयत्न झाला. भाजप नेते रजनीश सिंग यांनी या सर्व गैरव्यवहाराची तक्रार थेट पंतप्रधान कार्यालयाकडे केली होती, परंतु पीएमओने यावर थेट कारवाई न करता तक्रार अयोध्या जिल्हा प्रशासनाकडे वर्ग करून वेळ मारून नेली. देशाच्या गुप्तचर यंत्रणेने देखील तब्बल १२ गोपनीय अहवाल पाठवून पंतप्रधान कार्यालयाला या घोटाळ्याची कल्पना दिली होती, मात्र प्रशासकीय पातळीवर कोणतीही कडक कारवाई झाली नाही.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ या आरोपांची चौकशी करण्याऐवजी उलट आरोप करणाऱ्यांनाच धमकावत असल्याचा आरोप होत आहे, यामुळे ही परिस्थिती चोर सोडून संन्यासाला फाशी देण्यासारखी झाली आहे. काही अंधभक्त तर हिंदूंचा पैसा हिंदूंनीच चोरला, तर त्यात गैर काय? असे म्हणून या भ्रष्टाचाराचे समर्थन करत आहेत, ही अत्यंत खेदजनक बाब आहे.
सध्या उत्तर प्रदेश सरकारने या घोटाळ्याच्या चौकशीसाठी एसआयटी नेमली आहे. मात्र, अयोध्येतील स्थानिक साधू-संत आणि कमल नयन दास यांचे म्हणणे आहे की, जे अधिकारी आणि नेते स्वतः यात सामील आहेत, तेच जर चौकशी करणार असतील, तर निष्पक्ष न्याय कसा मिळणार? राम मंदिराच्या नावाखाली झालेला हा घोटाळा तर केवळ एक हिमनगाचे टोक आहे; देशातील अशा अनेक मोठ्या धार्मिक संस्थांमधील गैरव्यवहार अजून बाहेर येणे बाकी आहे. अशा वेळी सामान्य माणसाने डोळस होण्याची गरज आहे. आपण देवावरील श्रद्धेपोटी आपल्या घामाचा पैसा दान करतो, पण तो जर अशा प्रकारे भ्रष्ट नेत्यांच्या, ट्रस्टींच्या आणि त्यांच्या ड्रायव्हर्सच्या खिशात जाणार असेल, तर अशा ठिकाणी दान करणे पूर्णपणे थांबवले पाहिजे.
पश्चाताप करण्याची वेळ येण्यापेक्षा, आपण आपला कष्टाचा पैसा थेट समाजातील गरजू घटकांसाठी वापरला पाहिजे. पैशांभावी शिक्षण सुटणाऱ्या गरीब व होतकरू विद्यार्थ्यांची फी भरून किंवा त्यांना शैक्षणिक साहित्य देऊन मदत करावी. तसेच, आदिवासी आणि दुर्गम भागातील महिलांच्या आरोग्यासाठी व त्यांच्या रोजगारासाठी खर्च करावा. यासोबतच निसर्ग संवर्धन, वृक्षारोपण आणि जलसंधारणाचे काम करणाऱ्या प्रामाणिक संस्थांना आर्थिक बळ द्यावे. मानवाची सेवा हीच खरी ईश्वरसेवा आहे, हे ओळखून मंदिराच्या पेटीऐवजी जिवंत माणसांच्या कल्याणासाठी खर्च केलेला पैसाच देवाला खऱ्या अर्थाने पावेल.