अहिल्यानगर येथील स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) धडक कारवाई करत कोपरगावातून पळवून आणलेल्या एका १२ वर्षीय अल्पवयीन मुलीची दरेवाडी येथून सुखरूप सुटका केली आहे. या कारवाईदरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोन आरोपींना ताब्यात घेतले असून, त्यांना पुढील तपासासाठी कोपरगाव शहर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १८ ऑगस्ट २०२६ रोजी कोपरगाव येथील १२ वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात इसमाने पळवून नेले होते. याप्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम १३७(२) अन्वये अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
घटनेचे गांभीर्य ओळखून अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी तात्काळ विशेष तपास पथक स्थापन करून आरोपी व पीडितेचा शोध सुरू केला.
तपास सुरू असतानाच शुक्रवारी (२१ ऑगस्ट) पोलीस पथकाला गोपनीय बातमीदाराद्वारे महत्त्वपूर्ण माहिती मिळाली. संशयित आरोपी नूर राजू पठाण (वय १९, रा. आंबेडकरनगर, राहाता) याने पीडित मुलीस पळवून आणले असून, ते अहिल्यानगर-सोलापूर रस्त्यावरील दरेवाडी येथील हरीमळा परिसरात लपले असल्याचे कळाले. या माहितीच्या आधारे तपास पथकाने लागलीच दरेवाडी येथे छापा टाकून पीडित मुलीची सुटका केली आणि संशयित नूर पठाण यास ताब्यात घेतले.
ताब्यात घेतलेल्या आरोपीकडे आणि पीडित मुलीकडे अधिक चौकशी केली असता, त्यांना कोपरगावातून पळून येण्यास समीर मनोज सोनगत (वय २२, रा. हरीमळा, दरेवाडी) याने मदत केल्याचे आणि ते गेल्या दोन दिवसांपासून त्याच्याकडेच आश्रयाला असल्याचे निष्पन्न झाले. यानंतर पोलिसांनी समीर सोनगत यालाही तात्काळ ताब्यात घेतले.
ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे, पोलीस अंमलदार अरूण गांगुर्डे, फुरकान शेख, अशोक लिपणे, आजिनाथ पाखरे, रणजीत जाधव, अमृत आढाव, अभिजीत आरकल तसेच महिला पोलीस अंमलदार चिमा काळे व किरण ठुबे यांच्या पथकाने केली आहे. सुटका करण्यात आलेली मुलगी आणि दोन्ही आरोपींना पुढील कायदेशीर कारवाईसाठी कोपरगाव शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.