पवित्र श्रावण महिन्यात एकीकडे नागरिकांचे धार्मिक विधी, गृहप्रवेश, भंडारा आणि पूजा-अर्चा यांसारखे कार्यक्रम सुरू असताना, दुसरीकडे संगमनेर शहर व ग्रामीण भागात महावितरणच्या अनागोंदी कारभारामुळे नागरिकांना तीव्र त्रासाला सामोरे जावे लागत आहे. कोणताही वादळ-वारा किंवा पाऊस नसताना महावितरणचा निष्क्रियपणा उघड झाला असून, अखंडीत वीजपुरवठा देण्यास वीज महामंडळ पूर्णपणे अपयशी ठरले आहे. या पार्श्वभूमीवर वीज पुरवठा तात्काळ सुरळीत न झाल्यास शिवसेना स्टाईलने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शिवसेना उपजिल्हा संघटक रवींद्र उर्फ पप्पू कानकाटे यांनी महावितरण प्रशासनाला दिला आहे.
सध्या ग्रामीण भागात तीन-तीन तास भारनियमन (लोडशेडिंग) सुरू असून संगमनेर शहरातही विजेचा लपंडाव कायम आहे. अचानक वीज गायब होत असल्याने ज्या व्यावसायिकांचा व्यवसाय पूर्णपणे विजेवर अवलंबून आहे, त्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत असून नागरिकांचे हाल होत आहेत. त्यातच अनेक ठिकाणी विजेच्या तारा धोकादायकरीत्या खाली लोमकाळलेल्या अवस्थेत आहेत. यामुळे शॉर्टसर्किट होऊन आगी लागण्याच्या दुर्घटना घडत असून यामुळे मोठ्या जीवितहानीची शक्यता निर्माण झाली आहे.
एखादा सामान्य नागरिक वीज बिल भरण्यास उशीर करतो तेव्हा वीज कनेक्शन त्वरित तोडण्यात जी तत्परता अधिकारी दाखवतात, तीच तत्परता खंडित वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी का दाखवली जात नाही, असा संतप्त सवाल या वेळी उपस्थित करण्यात आला.
येत्या काही दिवसांत गणेशोत्सव सुरू होत असून या काळात विविध गणेश मंडळे व नागरिक रोषणाई तसेच धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करतात. या सण-उत्सवाच्या काळात महावितरणच्या अधिकाऱ्यांनी विशेष दक्षता घेऊन वीजपुरवठा सुरळीत ठेवावा. अन्यथा वीज महामंडळाच्या ढिसाळ कारभाराविरोधात तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा शिवसेना उपजिल्हा संघटक रवींद्र उर्फ पप्पू कानकाटे, उपशहर प्रमुख कैलास गायके, नितीन पारखे, युवा सेनेचे वैभव अभंग, विभाग प्रमुख दीपक अभंग आणि किरण गुंजाळ यांनी संयुक्तपणे दिला आहे.