Annant Ppangarkar
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन
संगमनेर तालुक्यातील अवैध धंदे, वाळू व मुरुमाचे बेकायदेशीर उत्खनन आणि तस्करी करणाऱ्यांविरोधात ‘मोक्का’, ‘तडीपारी’ व ‘एमपीडीए’ कायद्यांतर्गत कठोर पावले उचलावीत, असे स्पष्ट निर्देश अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी दिले आहेत.
शुक्रवारी जिल्हाधिकारी आशिया संगमनेर तालुक्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांच्या उपस्थितीत सर्व विभागांची आढावा बैठक पार पडली. या बैठकीत त्यांनी आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी गुन्हेगारांवर व्यापक प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचे आदेश दिले.
या दौऱ्यादरम्यान जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते कंजारभाट समाजातील विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. भटक्या व विमुक्त जमाती प्रवर्गातील या समाजाची कागदपत्रांअभावी गेल्या ४० वर्षांपासून प्रलंबित असलेली अडचण महसूल प्रशासनाच्या संवेदनशील भूमिकेमुळे दूर झाली आहे. घुलेवाडी, गुंजाळवाडी व धांदरफळ बुद्रुक येथील नागरिकांची स्थानिक पातळीवर चौकशी करून ही प्रमाणपत्रे निर्गमित करण्यात आल्याने विद्यार्थ्यांच्या पुढील शिक्षणाचा मार्ग आता सुकर झाला आहे.







