Annant Ppangarkar

मोहसीन शेख | महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन –

संगमनेर शहरातील दिल्ली नाका परिसरात कंटेनरखाली चिरडून सुमया मतीन तांबोळी (वय 40) या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून, शहरातील अवजड वाहतुकीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

संगमनेर शहराला बाह्यवळण रस्ता उपलब्ध असतानाही शहरातील प्रमुख रस्त्यांवरून मोठ्या प्रमाणात ट्रक, कंटेनर आणि इतर अवजड वाहतूक सुरू असल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. हॉटेल जोशी परिसर ते जोर्वे नाका, तीन बत्ती चौक ते दिल्ली नाका या मार्गावर यापूर्वीही मोठ्या वाहनांच्या अपघातांमध्ये नागरिकांना जीव गमवावा लागल्याच्या घटना घडल्या आहेत.

विशेषतः दुचाकीस्वार आणि पादचाऱ्यांसाठी या मार्गावरील अवजड वाहतूक धोकादायक ठरत असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली. मोठ्या वाहनांच्या वर्दळीमुळे वाहतूक कोंडी, अरुंद रस्ते आणि अपघाताचा धोका वाढत असल्याचा आरोपही नागरिकांकडून केला जात आहे.

महिलेच्या मृत्यूच्या घटनेनंतर परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने एकत्र आले आणि त्यांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. “शहराला बाह्यवळण रस्ता असताना अवजड वाहने शहरातून का धावत आहेत?”, असा सवाल संतप्त नागरिकांनी उपस्थित केला.

अपघात घडल्यानंतर केवळ घटनास्थळी बंदोबस्त करणे किंवा पंचनामा करण्यापेक्षा शहरातील अवजड वाहतुकीचे नियमन, वेळेचे निर्बंध, वाहतूक मार्गातील बदल आणि धोकादायक ठिकाणी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

दिल्ली नाका परिसरातील ही घटना पुन्हा एकदा संगमनेर शहरातील वाहतूक सुरक्षेचा गंभीर प्रश्न समोर आणणारी ठरली आहे. यापुढे आणखी एखादा निष्पाप नागरिक मोठ्या वाहनाखाली चिरडला जाण्याची वाट प्रशासन पाहणार का, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Share.
Leave A Reply