महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
संगमनेरमधून 23 गोवंशीय जनावरांची वाहतूक करणारी पिकअप चालकास मारहाण करून पेटवून देण्याची घटना नगर तालुक्यातील शेंडी येथे घडली आहे. यासंदर्भात जावेद पठाण याच्या तक्रारीवरून नगरच्या एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जावेद मुसा पठाण (वय 28 वर्ष रा. ममदापूर ता. राहता) हे आपल्या पिकअपमध्ये संगमनेर येथून 23 लहानमोठी गोवंशीय जनावरे घेऊन जात असताना नगरच्या शेंडीजवळ ही घटना घडली असल्याचे सांगितले जाते.
शेंडी बायपासवर या पिकअप गाडीचा काही लोकांनी पाठलाग सुरू केला होता. ही बाब पिकअप चालक पठाण यांच्या लक्षात आली असता या दरम्यान चालकाचा पिकअपवरील ताबा सुटून पिकअप पलटी झाली. त्यानंतर शेंडी बायपासवरील बर्डे वस्ती येथे आरोपींनी फिर्यादीस लाथा बुक्क्यांनी व लाकडी दांडक्याने मारहाण केली. तसेच पिकअप गाडी पेटवून दिली असल्याची तक्रार पोलीस ठाण्यात करण्यात आली.
पोलिसांनी चांगदेव भगत, सिद्धार्थ कराळे, भूषण भिंगारदिवे, नवनाथ भगत, बबलू उर्फ संदीप भगत, ज्ञानू दाणी, अतुल कराळे, योगेश संतोष शिंदे, विकास चव्हाण व अन्य चार ते पाच लोकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान संगमनेरमधून अद्यापही गोवंश जनावरांच्या कत्तली आणि येथील जनावरे बाहेर जाण्याच्या घटना वारंवार घडत असून येथील स्थानिक पोलीस नेमके काय करतात, या संदर्भात प्रश्नचिन्ह आहे. स्थानिक पोलिसांवर मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप झाले असून त्या विरोधात जन आंदोलनेदेखील झाली आहे. येथील कत्तलखाने केवळ राज्यातच नव्हे तर देशभरात बहुचर्चित ठरले आहेत.


