- महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
शहरालगतच्या समनापुर बायपासवर शहर पोलिसांनी एका संशयास्पद टेम्पोमधून सुमारे दोन लाखाचे गोमांस ताब्यात घेतले आहे. टेम्पो आणि गोमांस असा सुमारे नऊ लाखाचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.
पोलिसांच्या या कारवाईवरून ऐन दिवाळीतही शहरातील कत्तलखाने सर्रासपणे सुरू असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे संगमनेरातील गोहत्या थांबणार कधी? असा प्रश्न गो प्रेमींनी उपस्थित केला आहे.
गोवंश कत्तलीचे संगमनेर हे राज्यातील सर्वाधिक मोठे केंद्र म्हणून समोर येत आहे येथील बेकायदेशीर कत्तलखान्यांमध्ये सर्रासपणे जनावरांचे हत्या करून त्यांचे मांस राज्यासह देशाच्या विविध भागात पाठविले जाते. वारंवार होणाऱ्या पोलिसांच्या कारवाया आणि यातून बऱ्याचदा मोठ्या प्रमाणात हाती लागणारा मुद्देमाल, यामुळे येथील कत्तलखाण्याची महती लक्षात येते.
पोलिसांच्या सातत्याने होणाऱ्या कारवायानंतर देखील येथील कत्तलखाने बंद करण्यात प्रशासन अपयशी ठरत असल्याने संगमनेर येथील गोहत्या कधी बंद होणार असा प्रश्न निर्माण होत आहे.
दीपावली पाडव्याच्या दिवशी बुधवारी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास एका टेम्पोमधून गोवंश जनावराचे मांस वाहतूक केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर शहर पोलिसांच्या पथकाने शहरालगतच्या समनापुर बायपासवर सापळा लावला.
या सापळ्यात संशयास्पद टेम्पो अडकल्यानंतर त्याची तपासणी केली असता, त्यात सुमारे दोन लाखाचे गोमांस असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी टेम्पो आणि मांस ताब्यात घेतले असून याप्रकरणी दोघा जणांवर कारवाई केली आहे.
पोलीस कर्मचारी एकनाथ खाडे यांच्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात शाबान अली हुकूम अली शहा (वय ३८ रा. गोवंडी, मुंबई) आणि तोहिद दोस्त मोहम्मद पठाण (वय ३० रा. आळे, ता. जुन्नर) या दोघांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.
ऐन दीपावलीत संगमनेरातील कत्तलखाने सुरूच; पोलिसांच्या कारवाईत नऊ लाखाचा मुद्देमाल हस्तगत
शहरालगत समनापुर बायपासवर पोलिसांची कारवाई

