महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
राज्य सरकारने मोठा गाजावाजा केलेल्या सर्वात मोठ्या पोलीस भरतीला तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे. १ नोव्हेंबरपासून या बहुचर्चित पोलीस भरती प्रक्रियेला सुरुवात होणार होती. त्याशिवाय राज्य राखीव दलातील (एसआरपीएफ) पोलीस शिपाई भरतीही पुढे ढकलण्यात आली आहे.
राज्यभरात तब्बल १४९५६ पदांसाठी ही भरती होणार होती. आता या भरतीबाबत पुढील आठवड्यात निर्णय घेण्यात येणार आहे. तात्पुरत्या स्वरूपात ही भरती थांबविण्यात आली असली तरी ती निश्चित केव्हा होणार याबाबत अनिश्चितता आहे. भरती संदर्भातील निर्णय सरकार पुढील आठवड्यात घेणार असल्याची माहिती समोर येत आहे.
तत्कालीन महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात मागील तीन वर्षांमध्ये पोलीस भरती झाली नव्हती. त्यामुळे अनेक इच्छुक तरुणांची वयोमर्यादा संपल्याने ते भरतीसाठी पात्र ठरत नसल्याने अशा तरुणांना देखील संधी मिळावी यासाठी या पोलीस भरतीची वयोमर्यादा वाढविण्याचा सरकारचा विचार असल्याचे समजते. मिळालेल्या माहितीनुसार, या प्रशासकिय कारणास्तव पोलीस भरतीला स्थगिती देण्यात आली आहे. 
पुढील आठवड्यात पोलीस भरतीची वयोमर्यादा वाढवण्यात येऊन येऊन नव्याने भरतीची तारीख जाहीर होण्याची शक्यता आहे. या संदर्भातील घोषणा राज्य सरकार लवकरच करेल.


