महाराष्ट्र संवाद न्यूज
अक्षय (नाव बदललेले) तो आदिवासी समाजातील, साधारणपणे वय १९ वर्ष, त्याचे आई-वडिल मोठया बागायतदाराकडे १० ते १२ वर्षांपासून शेतमजूर म्हणून काम करायचे, तो ८ वीत गेल्यावर आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षण बंद झाले होते, मालकाचे घरी गोठ्यावर शेण-कुराचे काम करू लागला, सातत्याने त्याचा मालकाचे घराशी संपर्क येऊ लागला, मालकांचे घरात सर्वात मोठी तरुण मुलगी ती साधारणपणे साडेसतरा वर्षाची, घास कापणी आणि इतर गोठयावरील कामात तिचा आणि त्याचा संपर्क वाढला, वयाचे अंतर फार जास्त नसल्याने प्रेम वाढत गेले. मुलगी लग्नासाठी जास्तच दबाव आणत होती. सामाजिक दडपणामुळे त्याला ह्या सर्वांची भीती वाटत होती. दोघांत संबंध वाढल्याने मुलीने लग्न केले नाहीतर, आत्महत्या करील, अशी धमकी दिली होती. एकीकडे मुलीने दिलेली धमकी, दुसरीकडून मुलींच्या घराच्याकडून कायमचे संपवायची भीती असे असतानासुध्दा काळजावर दगड ठेऊन नाईलाजाने त्याने मुलीसोबत पळून जाऊन लग्न करण्याचा निर्णय घेतला. दोघे १०-१२ दिवस घरातून गायब झाले. मुलगी १७ वर्ष ६ महिन्याची अज्ञान असल्याने तिच्या आईवडिलांनी “पोस्को” कायद्याच्या अंतर्गत अपहरण आणि बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी त्याला अटक केली त्यांची रवानगी जेलमध्ये झाली होती.
मुलीला तिच्या वडिलांचे ताब्यात दिले गेले. आरोपींची आर्थिक परिस्थिती गरिबीची तसेच पोस्को कायद्याच्या जामीन मिळवण्यासाठी अत्यंत किचकट तरतुदीमुळे फुकट व्याप करून घेण्यास कुणीही वकील तयार होत नव्हता. सामाजिक संघटनांनी आरोपींचे वकीलपत्र देण्यावरून मी केसमध्ये हजर झालो. कोर्टाने पोलीसानी आरोपपत्र दाखल केल्यानंतर त्यास जामीन मंजूर झाला होता. परंतु लायक जामीनदार मिळत नसल्याने तो जेलमध्येच अनेक दिवस जामीन मिळूनही खितपत पडून होता. इकडे १८ वर्ष पूर्ण झाल्याने मुलींच्या घरच्यांनी तिला स्थळ शोधून लग्न करून दिले. हा प्रेमकैदी म्हणून अजूनही न्यायाच्या प्रतिक्षेत आहे. त्यामुळे अशा प्रेम प्रकरणात त्यातून फसल्या जाणाऱ्यांची संख्या हजारोच्या पटीत आहे. त्यामुळे वरील उदाहरण जरी प्रतिनिधीक स्वरूपाचे असले तरी समाजात अशा प्रकारची वाढत चाललेली प्रकरण पीडित मुलींची मानसिकता आरोपीची मानसिकता त्यातून वाढलेली सामाजिक गुंतागुंत ह्याचा आढावा घेण्याचा प्रयत्न केला आहे.
खरंतर पोस्को कायद्यामध्ये १८ वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलीशी शारीरिक संबंध ठेवणे अगर कोणत्याही प्रकारचे लैंगिक गैरवर्तन करणे, याबाबतचे गुन्हे मोडतात. १८ वर्षाखालील मुलगी ही कायद्याने अज्ञान समजली जात असल्याने तिची जरी पुरुषासोबत पळून जाण्यास संमती असली, अगर शारीरिक संबंध ठेवण्यास संमती असली तरी ती कायद्याने गृहीत धरली जात नाही. त्यामुळे अज्ञानाच्या संमतीला अर्थ नाही. त्यामुळे हल्ली प्रियकर तरुण कायद्याच्या अज्ञानामुळे अज्ञान मुलींना पळून घेऊन त्यांच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित करतात आणि बलात्कार अपहरणाचे गुन्ह्याचे शिकार होऊन बसतात. हल्ली दाखल होणाऱ्या बलात्कार आणि अपहरणाचे तक्रारीपैकी ९०% गुन्हे मुलीचे संमतीनेच घडलेले असतात. परंतु त्यामध्ये प्रियकराला जेलची वारी चुकत नाही. अशा अनेक गुन्ह्यामध्ये नातेवाईक व मित्रांनी पळून आलेल्या प्रियकर व अज्ञान मुलीला घरात आसरा दिल्याने त्यांना सुद्धा आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले जाते. नाहक जेलची वारी त्याचे पदरात पडते.
प्रेम हा शब्द ऐकायला लोभस वाटत असला तरी त्यापुढील कैदी हा शब्द सामाजिक द्वेष पैदा करणारा आहे. सध्याच्या काळात प्रेमातून कैदी बनण्याचे प्रमाण वाढले आहे. तसा नॅशनल क्राईम रिपोर्टचा अहवाल समाजाचे डोळे उघडविणारा आहे. प्रेमातून उद्भवलेले आजार त्यातून वाढत चाललेली सामाजिक गुन्हेगारी ही समस्या दिवसेदिवस जटिल बनत चालली आहे. खरंतर प्रेम आणि प्रेमभंग ह्यातून समाजात बलात्कार आणि खून आत्महत्याचे मोठे प्रमाण वाढले आहे. त्यात दरवर्षी हजारो तरुण-तरुणी भरडले जात आहे. प्रेमातून निर्माण होणाऱ्या बहुतेक गुन्ह्यांना जातिवादाची मोठी किनार आहे. त्यामुळे सामाजिक अस्पृश्यता, त्या माध्यमातून होणाऱ्या गुन्ह्याचे प्रमाण सर्वात जास्तच आहे.
प्रेमसंबंध, व्यावहारिक, व्यावसायिक संबध, लग्नाचे खोटे अमिष दाखवून ठेवलेले संबध, इतर वाद अश्या अनेक वेगळ्या बाजूची किनार असते. त्या बाजूची सुद्धा तपासणी न्यायाधीश, पोलीस यंत्रणा व वकिलावर असून प्रकरणातील सत्यशोधन करणे मोठे आव्हान होऊन बसते. खरे काय आणि खोटे काय? हे फक्त अत्याचार करणारा आणि पीडितेलाच माहिती असते. अनेक वेळा सामान्य माणसे प्रेम म्हणता म्हणता त्यात भरकट जाऊन नकळत मोठ्या गुन्ह्याची शिकार होऊन बसतात. कधीकधी स्वप्नात दिसणाऱ्या ‘बेड्या’ प्रत्यक्ष हातात पडतात, आणि माणूस एका मोठ्या षडयंत्राचा भाग बनून फसून जातो.
पण वर उल्लेख केलेल्या उदाहरणात सामान्य माणूस कसा “प्रेमाची” शिकार बनतो, अलगद प्रेमाच्या पाशात अडकतो. समाजात अश्या अनेक “प्रेमा” आहे, त्या पैशासाठी, शारीरिक भुकेसाठी किंवा दोघांची गरज म्हणून, आकर्षण म्हणून संमतीने संधिसाधू प्रेमसंबंध कुणाशी ठेवतील. नंतर समाजात एखादी गोष्ट पसरली तर ती झाकण्यासाठी बलात्काराच्या आरोपात निरपराध व्यक्तीला गुंतवत असतील तर अश्या ‘प्रेमा’पासून वेळीच सावध होऊन धडा घेणे गरजेचे आहे. नाहीतर ‘संमती’ या शब्दाची जागा पोलिसांना ‘बळजबरी’ लिहायला वेळ लागत नाही. वास्तविकपणे त्यात पोलिसांचा दोष नाही. त्याच्यावर दडपण आणून फिर्याद घ्यायला भाग पाडणारे अनेक समाजसेवक बसले आहेत. ते श्रीमंत खरोखरच बलात्काराचे प्रकरणात अडकत असतील. तर ते गप्प राहतात आणि गरीब प्रेमप्रकरणात जरी अडकला तर ते मोर्चा काढून फाशीची मागणी करतात. एकंदर सर्व गोष्टी बघितल्या तर कोर्टापुढे सत्य येण्यास बराच कालावधी जातो. शब्दाचे खेळामध्ये सामान्य माणूस अडकून जातो. खर तर संमती आणि बळजबरी हे शब्द परस्परविरोधी आहे पण चुकीचा कायद्याचा अर्थ लावून त्यात संमतीने केलेले प्रेम “बलात्कार” ठरते आणि ठरवण्याचा प्रयत्न समाज घटकाकडून केला जातो. अनेकवेळा आंतरजातीय विवाह, प्रेमभंग, समंतीने ठेवलेल्या संबंधात वाद झाल्याने, नैराश्य तसेच आर्थिक वादातून पिळवणूकीतुन इत्यादीसाठी सुद्धा बलात्काराच्या खोट्या केस दाखल होतात. नकळत चांगली माणसे त्यात भरडली जातात. त्यामुळे प्रेम उघड्या डोळ्यांनी करावे,अन्यथा हेच प्रेम तुम्हाला कैदी बनून तुरुंगाची हवा खायला लावायला नको इतकेच” या निमित्ताने सांगावेसे वाटते.
अँड. गोरक्ष कापकर
मो. नं. ९९२१३८६९८४

