महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर:
पुणे-नाशिक महामार्गावरील वाहतुकीस अडथळा निर्माण होणे, ग्राहकांच्या वाहनांची बेशिस्त पार्किंग तसेच परिसरात अस्वच्छता निर्माण केल्याप्रकरणी संगमनेर नगरपरिषदेने वेदांत वाईन्सला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. मुख्याधिकारी दयानंद गोरे यांच्या निर्देशानुसार ही कारवाई करण्यात आली आहे.
नगरपरिषद प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे की, पुणे-नाशिक महामार्गालगत असलेल्या वेदांत वाईन्ससमोर दररोज सायंकाळच्या वेळेत मोठ्या प्रमाणात ग्राहकांची गर्दी होत असते. मद्य खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांकडून वाहने रस्त्यावरच उभी केली जात असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. हा मार्ग शहरातील प्रमुख व वर्दळीचा असल्याने अपघाताचा धोका वाढत असल्याची बाब प्रशासनाने गांभीर्याने घेतली आहे.

तसेच काही मद्यधुंद व्यक्तींकडून परिसरात गोंधळ घालण्याच्या तक्रारीही प्रशासनाकडे प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा आणि वाहतुकीच्या सुरळीततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. याची दखल घेत नगरपरिषदेने संबंधित वाईन्स व्यवस्थापनाला गर्दी नियंत्रणासाठी स्वतंत्र कर्मचारी नियुक्त करणे, वाहनतळाचे नियोजन करणे आणि ग्राहकांकडून होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
याशिवाय वेदांत वाईन्सकडून दैनंदिन घनकचरा नगरपरिषदेच्या घंटागाडीत न देता सार्वजनिक ठिकाणी टाकला जात असल्याचेही निदर्शनास आले आहे. त्यामुळे परिसरात दुर्गंधी व अस्वच्छता निर्माण होत असून नागरिकांकडून तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या प्रकरणी संबंधितांना तीन दिवसांच्या आत लेखी खुलासा सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. समाधानकारक खुलासा न केल्यास ५० हजार रुपयांपर्यंत दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे नोटिशीत नमूद करण्यात आले आहे.
प्रशासनाच्या सूचनांकडे दुर्लक्ष झाल्यास संबंधित वाईन्सचा परवाना रद्द करण्याचा प्रस्ताव विचाराधीन घेतला जाईल, तसेच सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकल्याचे पुन्हा आढळल्यास पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशाराही नगरपरिषदेने दिला आहे.
“वाहतूक आणि स्वच्छतेच्या नियमांचे पालन करणे प्रत्येक व्यावसायिकाची जबाबदारी आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेशी तडजोड होऊ देणार नाही. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल.”
— दयानंद गोरे, मुख्याधिकारी, संगमनेर नगरपरिषद



