महाराष्ट्र संवाद न्यूज
राज्यभरात ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. सरपंचपदासह सदस्य निवडीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केलेला असून ऑनलाईन पद्धतीने उमेदवारी अर्ज भरताना इच्छुक उमेदवारांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे वारंवार वेबसाईट मध्ये खंडितपणा येत असल्याची दखल आयोगाने घेतली असून पारंपारिक पद्धतीने उमेदवारी अर्ज स्वीकारण्याचे आदेश राज्यातील जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.
भारतीय संविधानाच्या अनुच्छेद २४३ के व २४३ झेड ए अन्वये राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे पर्यवेक्षक, संचालन व नियंत्रण याची सर्व जबाबदारी राज्य निवडणूक आयोगाची आहे. निवडणूक आयोगाने (दि. ०९/११/२०२२) च्या आदेशान्वये राज्यातील ७७५१ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी सदस्य पदासह थेट सरपंचपदाचा निवडणूक कार्यक्रम आयोगाने जाहीर केलेला असून या कार्यक्रमानुसार संगणकप्रणालीद्वारे दिनांक २८/११/२०२२ ते दिनांक ०२/१२/२०२२ या कालावधीत संगणक प्रणालीव्दारे नामनिर्देशनपत्र भरण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
उमेदवारी अर्ज दाखल करण्यास काही तासांचा अवधी शिल्लक असल्याने आणि त्यातच ऑनलाईन उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सातत्याने सर्व्हर समस्या निर्माण होत आहे. त्यामुळे इच्छूक उमेदवार नामनिर्देशनापासून वंचित राहू नये व त्यांना निवडणूक लढविण्याची संधी मिळावी म्हणून आयोग नामनिर्देशनपत्र पारंपारिक पध्दतीने (off line) स्वीकारण्याची परवानगी दिली असल्याची माहिती संगमनेरचे तहसीलदार अमोल निकम यांनी दिली आहे.
तसेच उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा उद्याचा शुक्रवारचा शेवटचा दिवस असून त्यासाठी देखील आयोगाने वेळ वाढवून दिली आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांना सायंकाळी साडेपाच पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत.

