महाराष्ट्र संवाद न्यूज
टपाल विभागाच्या दीनदयाळ स्पर्श शिष्यवृत्ती योजनेत राज्य पातळीवर अहमदनगर जिल्ह्यातून श्रीरामपूर विभागातील दहा विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. विशेष म्हणजे निवडले गेलेले सर्व विद्यार्थी संगमनेर मधील विविध शाळांचे आहेत, अशी माहिती श्रीरामपूर डाक अधीक्षक हेमंत खडकेकर व संगमनेरच्या मुख्य डाकघर येथील विपणन अधिकारी अमोल गवांदे यांनी दिली.
निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये दिगंबर गणेश सराफ विद्यालयातील नक्ष चंद्रकांत खामकर (इयत्ता सहावी), स्वामिनी संदीप चव्हाण (इयत्ता सातवी), प्रज्योत प्रदीप शेळके (इयत्ता नववी), मातोश्री रु. दा. मालपाणी विद्यालयातील श्रद्धा विलास ताजने (इयत्ता आठवी), सुमित महेश देशमुख (इयत्ता आठवी), तनिष्क संतोष दिवे (इयत्ता नववी), अमृतवाहिनी इंटरनॅशनल स्कूलमधून समरजीत विश्वास वाघ (इयत्ता सातवी), दिव्याल कैलास खाडे (इयत्ता सातवी) आणि ध्रुव ग्लोबल स्कूलमधील तेज निलेश जैन (इयत्ता सहावी) आणि गार्गी संजय विखे (इयत्ता सातवी) यांचा समावेश आहे.
भारतीय टपाल विभागाच्या वतीने टपाल तिकिटांचा संग्रह (फिलाटेली छंद) व संग्राहक वाढविण्याच्या प्रयत्नांना अधिक बळकटी देण्यासाठी इयत्ता सहावी ते नववीच्या विद्यार्थ्यांकरिता ‘दीनदयाळ स्पर्श योजना २०२२-२३’ चे आयोजन करण्यात आले होते. या परीक्षेत महाराष्ट्रामधून चाळीस विद्यार्थ्यांची निवड झाली. त्यापैकी दहा विद्यार्थी अहमदनगर जिल्ह्यातील असून डाक विभागाच्या श्रीरामपूर विभागातून निवडले गेले आहेत. विशेष म्हणजे निवड झालेले सर्वच्या सर्व दहा विद्यार्थी हे संगमनेरमधील आहेत.
निवड झालेल्या विद्यार्थ्यांना वार्षिक ६ हजार रुपये शिष्यवृत्ती डाक विभागा मार्फत दिली जाणार आहे. लहान वयात मुलांमध्ये टपाल तिकीट संग्रह करण्याच्या छंदास प्रोत्साहन देण्यासाठी या शिष्यवृत्ती परीक्षेचे आयोजन करण्यात येते. श्रीरामपूर विभागाचे डाक अधीक्षक हेमंत खडकेकर यांनी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले असून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यशस्वी विद्यार्थ्यांना संगमनेरच्या मुख्य डाकघर येथील विपणन अधिकारी अमोल गवांदे, पोस्ट मास्तर महेश कोबरने, रोखपाल अमित देशपांडे आदींनी मार्गदर्शन केले.

