रविवार विशेष । प्रवीण पुरो
(लेखक दैनिक आपलं महानगरचे माजी निवासी संपादक आहेत)
अभिसार शर्मा, प्रसुनकुमार बाजपेयी, राजदीप सरदेसाई, आशुतोष, नवीनकुमार, अजित अंजूम, निखिल वागळे या दिग्गजानंतर आता वेळ आलीय रविश कुमार यांची. सत्तेला जे पचत नाही त्यांना मुळासकट उखडून टाकण्याचा बाणा मोदी सरकारने हाती घेतलाय. या बाण्याचे देशातील पत्रकारांमधले सत्तरावे बळी ठरलेत रविश कुमार. सारी माध्यमं सरकारपुढे लोटांगण घालत असताना जाब विचारणाऱ्या एनडीटीव्हीला टाळं ठोकण्याचा पराक्रम मोदी सरकारने करून पाहिला. प्रणव रॉय आणि त्यांच्या पत्नी राधिकांवर नको-नको ती बंधनं घालण्याचा प्रयत्न झाला. पण तरीही आपला आवाज एनडीटीव्हीने तेवत ठेवला. रविश कुमार यांच्या माध्यमातून सरकारला सळो की पळो करून सोडलं.
रविश यांच्यावर सत्ताधारी एकतर्फी पत्रकारितेचा आरोप करायचे. पण सारी माध्यमं तुमच्यापुढे लोटांगण घालत असताना, ती सत्तेची बटिक झाली असताना एक एनडीटीव्ही प्रश्न विचारत असेल तर ते एकतर्फी कसं म्हणता, असा खडा सवाल रविश करत. तेव्हापासून रविश यांच्यापुढे बोलण्याची हिंमत कोणी करू शकला नाही. केवळ ब्रॅण्ड असून चालत नाही. त्याचा परिचालक कोण आहे, यावर त्या ब्रॅण्डचं महत्व टिकून असतं. पत्रकारितेचा सज्जा घातलेल्या प्रणव रॉय यांच्या एनडीटीव्हीत रविश यांनी भरगच्च इमारत उभी केली. प्रश्न विचारायची प्रणव यांनी दिलेली मोकळीक रविश यांच्या पत्रकारितेसाठी मैलाचा दगड ठरली. मालक आशीर्वादासह सोबत असेल तर पत्रकाराला हात लावण्याची हिंमत कोणी करू शकत नाही, हे सूत्र एनडीटीव्हीने पाळलं. यामुळेच रविश अधिक फुलत गेले.
लाचार झालेल्या इतर माध्यमांप्रमाणे प्रणव यांनी आपल्यापुढे नतमस्तक व्हावं म्हणून हरतर्हेचे प्रयत्न झाले. त्यांच्यावर अटकेसारखी कारवाई झाली. विदेशात जाण्यावाचून त्यांना दरवाजे बंद करण्यात आले. तरी प्रणव वाकले नाहीत. सत्तेच्या दंडेलीला ठोकरणारे प्रणव वाकत नाहीत म्हटल्यावर रविश यांना वश करण्याचा प्रयत्न झाला. पण तोही कामी आला नाही. अखेर एनडीटीव्हीवरील प्रणव आणि त्यांच्या पत्नी राधिका यांची मालकी काढून घेत एनडीटीव्हीची ओळख पुसण्यास आली. आदानी समुहाचे प्रमुख गौतम आदानी यांनी हे माध्यम आपल्याकडे घेतलं आहे.
१ लाख ८८ हजार कोटींच्या कर्जाचं ओझं घेत केंद्रातल्या मोदी सरकारचा जावई बनलेला हा उद्योगपती आता एनडीटीव्ही चालवणार आहे. मोदी सरकारच्या काळातला हा सर्वात मोठा विनोद होय. याआधी झीटीव्हीचे शेअर्स खरेदी करून अंबानी समुहाने हे माध्यम आपल्याकडे घेतलं. त्याआधी राजदिप सरदेसाई आणि निखिल वागळे मोदी सत्तेला जाब विचारतात म्हणून या दोघांना आपल्याकडे खेचण्याचा पुरेपूर प्रयत्न झाला. पण सत्तेपुढे लाचारी नाही, असा ठाम निर्धार केला आणि आयबीएन-लोकमतची खरेदी झाली. राजदिप आणि निखिल यांची ‘पिडा’ सत्तेने अशी दूर केली. माध्यमांमध्ये पत्रकारांच्या स्वातंत्र्याला अर्थ राहिलेला नाही, हे यावरून लक्षात येईल. मालकाला जे पाहिजे ते देणारी पत्रकारिता माध्यमांमध्ये शिरल्याचं चित्र संपूर्ण देशभर आहे.
याला माध्यम स्वातंत्र्यावरील हल्ला म्हणून कोणी गणलं की सत्तेचे चाटू त्यावर तुटून पडतात. त्यांना आठवते ती इंदिरा गांधींनी लादलेली आणीबाणी. होय, तीही गैरच होती. पण ती आणीबाणी ही घटनेने दिलेल्या अधिकाराचाच भाग होती. सध्याच्या आणीबाणीला काहीएक कारण नाही. छुप्या पध्दतीने ती माध्यमांच्या मानगुटीवर बसवण्यात आली आहे. सत्तेची लाचारी स्वीकारणार नाही, त्यांची शासकीय रसद रोखण्याचा, त्यांचे सरकारी मदतीचे दरवाजे बंद करण्याचा अघोरी मार्ग हाती घेतला जातो. सत्तेकरिता लिहिणाऱ्यांसाठी या गाठोड्या सताड उघड्या असतात. यामुळे असेल नसेल ते सत्तेसाठी, हा एकच ध्यास माध्यमांनी स्वीकारलेला दिसतो.
यात रविश यांच्यासारख्यांचा कस लागला होता. असली लाचारी स्वीकारतील ते रविश कसले? पत्रकारितेचा मॅगसेसे पुरस्कार विजेते रविश कुमार यांनी सत्तेला प्रश्न विचारण्याचा आपला हक्क शाबुत ठेवला आणि चिमणीचं घरटं सत्तेने उखडून टाकलं. प्राईम टाईम, रविशकी रिपोर्ट, हम लोग, देशकी बात अशा एकाहून एक प्रसिध्द शोमधून रविश यांनी सत्ताधाऱ्यांना भंडावून सोडलं होतं. ‘गोदी मिडिया की गुलामी से लडना है’ या रविश यांच्या एका टॅगने सत्तेच्या लाचारीत अखंड बुडालेल्या पत्रकारांना त्यांनी विचार करायला लावलं आहे. आजची संध्याकाळ अशी आहे, जिथे पारखरांच घरटं दिसेनासं झालं आहे. बहुतेक ते कोणी तरी उखडलं असावं. पण चिमणीला आकाश मोकळं आहे. या रविश यांनी व्यक्त केलेल्या भावनेत सारी दु:ख विसावली आहेत.
रविश यांच्या याच भावना त्यांना मॅगसेसे पुरस्कार जाहीर झाला तेव्हा मॅगसेसे वेबसाईटने व्यक्त केल्या होत्या. गेल्या काही वर्षांत भारतातील स्वतंत्र पत्रकारितेचं अवकाश कमी होत चाललं आहे, असं या वेबसाईटने म्हटलं होतं. वेबच्या या भावनेनंतर गोदीत बसलेल्या माध्यमांनी एकच काहूर माजवला. आणि रविश यांचं कौतुक करण्याऐवजी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली. मोदींसाठी विकले गेलेले हे पत्रकार काय लायकीचे आहेत, हे तेव्हाच कळलं. आपल्या न्यूजरूमला जनतेचं व्यासपीठ समजल्या जाणाऱ्या माध्यमांमध्ये एनडीटीव्हीने स्थान मिळवलं होतं. हुकमी सत्तेत जनतेचा आवाज बनणारेच खरे पत्रकार, असं रविश म्हणतात ते उगीच नाही. सत्तेची तळी उचलून धरणाऱ्या माध्यमांचा जनतेशी तुटलेला संवाद पाहाता जनतेचा आवाज आता माध्यमांच्या पचनी पडत नाही, हेच खरं.
एनडीटीव्हीचे ३२.२६ टक्के शेअर्स अजूनही प्रणव रॉय आणि राधिका यांच्या मालकीचे आहेत. पण सर्वाधिक वाटा हा आदानींकडे गेल्याने एनडीटीव्हीवरील नियंत्रण रॉय यांच्याकडून आदानींकडे गेलं. लागलीच संजय पुगलिया, सुदिप्ता भट्टाचार्य आणि सेंथिल चेंगलवरायन यांची नवे संचालक म्हणून नियुक्ती जाहीर झाली, त्यासरशी एनडीटीव्ही गोदी मिडियाचा नवा भाग बनला हे स्पष्ट झालं. हे सगळं करण्यासाठी यंत्रणा आदानींसाठी कशा पाणी भरत होत्या ते पाहाणंही महत्वाचं आहे. सरकारी नियंत्रणेतील सेबीने यासाठी घेतलेला पुढाकार घृणास्पद होता. देशाच्या आर्थिक यंत्रणा या स्वतंत्र बाण्याच्या असाव्यात असा दंडक आहे. पण सेबीने ते सूत्र गुंडाळून ठेवलं. प्रणव रॉय यांच्याकडे असलेले शेअर्स हस्तांतर करणं, त्यांची विक्री करण्यावर सेबीने २०२० पासून बंदी घातली होती. यामुळे अधिक शेअर्स निर्माण करण्याचा रॉय यांचा अधिकार रोखला गेला. २००९ मध्ये एनडीटीव्हीकरिता रॉय यांनी विश्वप्रधान कंपनीकडून ३५० कोटींचं कर्ज उचललं होतं. कर्जातील करारानुसार कर्ज न फेडल्यास त्याचं रुपांतर इक्विटीमध्ये होणार होतं. त्यानुसार आदानींच्या व्हीसीपीएलने एनडीटीव्हीमधील २९ टक्के वाटा ताब्यात घेतला.
लाचारीची हद्द ही की एनडीटीव्हीचं असं हस्तांतरण होताच रविश यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याचं एनडीटीव्हीच्या ग्रूप प्रेसिडेंट सुपर्णा सिंह यांनी जाहीर केलं आणि कोणतीही सबब न सांगता तो मंजूर केल्याचं म्हटलं. ज्यांनी एनडीटीव्हीला इतक्या उच्चस्थानी नेऊ ठेवलं ते रविश आदानींच्या एनटीटीव्हीत राहणं कदापि शक्य नव्हतं. पण म्हणून त्यांच्या राजीनाम्यावर विचारणाच होणार नसेल तर तो रविश यांच्यावर क्रूर अन्यायच म्हटला पाहिजे. कंपनी उभारणीत मोलाचा वाटा असलेल्या व्यक्तीलाच दूर सारण्याचा प्रयत्न हा माणूसकीलाही लाजवणारा आहे, हे आदानींच्या लक्षात येणार नाही. ज्यांचे उद्योग देशातल्या कष्टकऱ्यांच्या पैशावर पोसले जातात त्यांना असल्या माणुसकीचं काहीही देणंघेणं नसतं.
भारतात पत्रकारितेला सोन्याचे दिवस कधीच नव्हते, पण आतासारखं भस्म यूग तर कधीच नव्हतं, असं रविश एका संदेशात म्हणतात ते खरंय. घरची मुलगी दुसऱ्यांच्या घरी जाते तेव्हा ती दूर जाता जाता आपल्या घराकडे पहात असते. आपली स्थिती आज अशी झाल्याचं सांगताना रविश भावूक झालेले तमाम जनतेने पाहिले. १९९६ पासून एनडीटीव्हीत अँकर म्हणून रुजू होण्याआधी रविश यांनी तिथे येणाऱ्या जनसंवाद पत्रांची जुळवाजुळवही केली होती. जनतेचे प्रश्न हे त्यांना याच काळात अधिक भावले. चहा विकून जहाजात सफर करणाऱ्यांसारखी स्वप्न मी पाहणार नाही, असं सांगणाऱ्या रविश यांनी मॅचच संपल्याने आता खेळाडू म्हणून टिकून राहण्याचीही गरज नाही, असंच अनेकांना वाटत असतं. पण तसं होणार नाही, असा संदेश दिलाय.
जनतेला कवडीमोल समजणारे शेठ अनेक देशात आहेत. जे एनडीटीव्ही खरेदी करून तुमच्या खिशात डॉलर टाकण्याचा प्रयत्न करत आहेत. खरं लिहिणाऱ्यांवर शेठ कोर्ट केस लावतो आणि सत्संगात जाऊन पत्रकारांचं भलं चाहत असल्याचं प्रवचन देतो. भारतातल्या शेठजींचं सध्या असंच काहीसं सुरू आहे. तेव्हा रविशजी काळजी नसावी, तुमचे अनेक चेहरे देशात आजही आहेत जे तुमच्या सोबत आहेत, राहतील…
