रविवार विशेष
शिक्षण हा तिसरा डोळा, असे आपण म्हणतो. त्याचा प्रत्यय येथील इंदिरा नगरमध्ये राहणार्या एरंडे कुटुंबात आला असून विडी कामगार म्हणून काम करणार्या श्रीमती इंदुबाई एरंडे यांचा नातू तुषार उत्तम एरंडे महाराष्ट्र लोकसेवा परीक्षा उत्तीर्ण होऊन कणकवली येथे महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागात उपअभियंता म्हणून रुजू झाला आहे. सामान्य कुटुंबांना लढण्याचं बळ देणारी ही यशकथा होय.
गणपत एरंडे व इंदुबाई एरंडे हे दांपत्य संगमनेरच्या भिकुसा यमासा क्षत्रिय विडी कारखान्यात विड्या वळण्याचे काम करीत. त्यांना रवींद्र, उत्तम व सुदाम ही तीन मुले. मुले लहान असतानाच वयाच्या ३० व्या वर्षी १९७३ मध्ये गणपत एरंडे यांचे निधन झाले. त्यामुळे नंतर निर्माण झालेल्या परिस्थितीला तोंड देताना श्रीमती इंदुबाई एरंडे डगमगल्या नाहीत. पतीनिधनाने आभाळ कोसळले तरीही विड्या बांधून त्यांनी आपल्या तीनही मुलांना शिक्षण दिले.
मुलांनीही मिळेल ती कामे करुन शिक्षण पूर्ण केले. मोठा मुलगा रवींद्र बारावीनंतर नाशिकला मामाकडे गेला. तिथे व्हीआयपी इन्डस्ट्रीजमध्ये नोकरी केली. नोकरी सांभाळून ‘मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नलिझम’ ही पदवी प्राप्त केली. पत्रकार म्हणून त्यांनी नावलौकीक मिळविला. सामाजिक कार्याच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती राज्य पुरस्कार, गुणवंत कामगार कल्याण पुरस्कार, नाशिक महानगरपालिकेचा लोककल्याण पुरस्कार असे अनेक पुरस्कार प्राप्त केले.
दुसरा मुलगा उत्तम यांनी एम.ए.बी.एड. ही पदवी संपादन केली व संगमनेरच्या मालपाणी विद्यालयात ते इंग्रजी विषयाचे शिक्षक आहेत. तर तिसरा मुलगा सुदाम यांनी डिप्लोमा इन इन्स्ट्रुमेंटेशन ही पदवी संपादन केली. संगमनेरमध्ये त्रिमूर्ती बुक सेलर्स नावाने सुरू केलेल्या व्यवसायात त्याने जम बसविला. 
इंदुबाई एरंडे यांच्या शिक्षक असलेल्या उत्तम एरंडे यांचा मुलगा तुषार याला लहानपणापासूनच अभ्यास आणि खेळाची आवड होती. मालपाणी विद्यालयात तुषारचे माध्यमिक शिक्षण झाले. त्याचवेळी हँडबाॅल या क्रीडा प्रकारात त्याने नाव कमावले. तो बारावीनंतर कोपरगावला इंजिनिअरिंग शिक्षणासाठी गेला. तिथे त्याने बी.ई (सिव्हील) ही पदवी संपादन केली. त्याचवेळी हँडबाॅल या खेळात राष्ट्रीय स्पर्धांमध्येही त्याने यश मिळविले. 
बी.ई. पदवीनंतर तुषार महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परिक्षेच्या अभ्यासासाठी पुण्याला गेला. खुल्या प्रवर्गातून केवळ अभ्यासाच्या बळावर तो ही परीक्षा उत्तीर्ण झाला. मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते त्याला नव्या नोकरीचे नियुक्तीपत्र देण्यात आले. सार्वजनिक बांधकाम विभागात उपअभियंता या पदावर तुषारची कणकवली येथील कार्यालयात नियुक्ती झाली. अर्थात यामागे त्याची आजी श्रीमती इंदुबाई एरंडे यांची प्रेरणा आहे. ती स्वतः अशिक्षीत असली तरी विड्या बांधून या माऊलीने मुलांना उच्चशिक्षण दिले. मुले तर उच्चशिक्षित आहेच, शिवाय त्यांची दोन नातवंडे एमबीए तर तीन नातवंडे इंजिनिअरिंग पदवी प्राप्त आहेत.
आज इंदुबाई एरंडे यांचा नातू तुषार हा एरंडे कुटुंबातील पहिला शासकीय अधिकारी झाला आहे. प्राप्त परिस्थितीला जिद्दीने सामोरे जात जिद्द, चिकाटी, परिश्रम आणि निश्चित ध्येय समोर असले की, हमखास यश मिळते. याचे आदर्श उदाहरण म्हणजे तुषारचे यश होय. त्यामुळेच विडी कामगार आजींचा नातू महाराष्ट्र शासनाच्या सेवेत रुजू झाला आहे. सामान्य कुटुंबांना लढण्याचं बळ देणारी ही यशकथा होय.
रवींद्र एरंडे, मोबा. ९४२२२५४८९५

