महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
संगमनेर : संगमनेर साहित्य परिषद आणि पिंपरणे येथील परमपूज्य गगनगिरी महाराज विद्यालयाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धेत १० तालुक्यातील ७३ विद्यालयामधील २४६ स्पर्धकांच्या सहभागामुळे या स्पर्धेला मोठा प्रतिसाद मिळाला.
स्पर्धेचे हे बारावे वर्ष होते. परमपूज्य गगनगिरी महाराज विद्यालय संस्थेचे अध्यक्ष बापूसाहेब देशमुख आणि संगमनेर साहित्य परिषदेचे अध्यक्ष अरविंद गाडेकर यांच्या उपस्थितीत केलेल्या दीप प्रज्वलनाने स्पर्धेची सुरुवात झाली. यावेळी माजी प्राचार्य ज्ञानेश्वर गोंटे, डॉ. जी. पी. शेख, डॉ. हनुमंत मोटेगावकर, प्रा. शशांक गंधे, नंदकुमार बेल्हेकर, प्रकल्प सचिव कैलास काळे, सुरेश ठोंबरे, माजी गटशिक्षणाधिकारी सुभाष पवार, प्राचार्य मुकुंद डांगे, स्वाती देशमुख, प्रकल्पप्रमुख बाळकृष्ण महाजन, विभागप्रमुख ललित शेळके आदी मान्यवर उपस्थित होते.
चार विविध गटांमध्ये या स्पर्धा घेण्यात इयत्ता तिसरी आणि चौथीच्या गटामध्ये पन्नास स्पर्धक सहभागी झाले होते. पाचवी ते सातवीच्या दुसऱ्या गटामध्ये नव्वद स्पर्धक, आठवी ते दहावीच्या गटामध्ये सत्याहत्तर व अकरावी बारावीच्या गटांमध्ये एकोणतीस स्पर्धक सहभागी झाले होते. स्पर्धक विद्यार्थी त्या-त्या विद्यालयांमधून निवडून पाठवलेले असल्यामुळे एकापेक्षा एक वरचढ अशी भाषणे स्पर्धेत स्पर्धकांनी सादर केली.
या स्पर्धेत यशस्वी स्पर्धक निवडताना परीक्षकांची कसोटी लागली. विद्यार्थी स्पर्धकांनी अत्यंत अभ्यासपूर्ण मांडणी करत आत्मविश्वासपूर्ण सादरीकरण केले.
स्पर्धक विद्यार्थी त्यांचे मार्गदर्शक शिक्षक, परीक्षक या सर्वांसाठी भोजन व्यवस्था उत्तम प्रकारे करण्यात आली होती. प.पू. गगनगिरी महाराज विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद व स्वयंसेवक विद्यार्थी या व्यवस्थेत स्वयंस्फूर्तीने सर्व स्पर्धक व परीक्षक शिक्षक यांची सुयोग्य व्यवस्था पहात होते.
विजेत्या स्पर्धकांना बारा फिरते सांघिक करंडक, बारा वैयक्तिक कायमस्वरूपी स्मृतिचिन्ह आणि सुमारे साडेबारा हजार रुपयांची रोख पारितोषिके दिली जाणार आहेत. याशिवाय सहभागी सर्व स्पर्धकांना परमपूज्य स्वामी गगनगिरी महाराज यांचा संदेश असलेले आकर्षक प्रमाणपत्र दिले जाणार असल्याची माहिती देण्यात आली.
या स्पर्धांसाठी प्रा. सुरेश परदेशी, स्मिता गुणे, सुलभा जोशी, इद्रीस शेख, गिरीश सोमानी, मनोज साकी, अनिल सोमणी, लक्ष्मण ढोले, प्रकाश कोटकर, श्रीमती मंगला पराशर आदी मान्यवरांनी विशेष परिश्रम घेतले. ग्रामस्थ व पालक यांचाही उत्तम प्रतिसाद व सहभाग या स्पर्धांना लाभला .
संगमनेर साहित्य परिषदेच्या सदस्यांनी आयोजनाबरोबरच परीक्षणाची महत्त्वाची भूमिका या स्पर्धांच्या वेळी पूर्ण केली आहे. प्रा. डॉ. अलका पेटकर, श्वेता सराफ, पुष्पा नि-हाळी, स्वप्नील कोल्हे, दिलीप क्षीरसागर, सुरेश म्हाळस, सौरभ म्हाळस, नंदकुमार बेल्हेकर, निलेश पर्बत, संतोष पवार, बाबासाहेब मेमाणे आदींनी परीक्षणाची जबाबदारी पार पाडली.

