महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
अनंत पांगारकर
संगमनेर : म्हाळुंगी नदीला आलेल्या पुरानंतर स्वामी समर्थ मंदिर ते साईबाबा मंदिर, गंगामाई घाटाकडे जाणारा पूल खचल्याने तब्बल अडीच महिन्याच्या कालावधीनंतर देखील त्याची दुरुस्ती प्रशासनाला करता आलेली नाही. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांना या पुलावरून जीवघेणी कसरत करावी लागत आहे. पुलावरील शॉर्टकट प्रशासनाच्या अकार्यक्षमतेमुळे धोकादायक ठरण्याची चिन्हे आहेत. या धोकादायक शॉर्टकटचा व्हिडिओ येथील नागरिकांनी महाराष्ट्र संवाद न्यूजला पाठवला आहे.
यावर्षी म्हाळुंगी नदी वारंवार आणि दीर्घकाळ प्रवाही राहिली आहे. त्यातच झालेल्या पावसामुळे नदीला पूर आल्याने नदीवरील घोडेकर मळ्याकडे जाणारा कच्चा फुल वाहून गेला. मात्र या लगतच असलेला साई मंदिर, पंपिंग स्टेशन, गंगामाई घाट, घोडेकर मळा, वेताळेश्वर महादेव मंदिर आदी भागाला जोडणारा पूल वाहतूक योग्य असल्याने फारसा ताण जाणवला नाही. मात्र काही दिवसातच म्हाळुंगी नदीवरील हा पूल देखील खचला. पूल खचल्यामुळे तो धोकादायक बनल्याचे कारण पुढे करत पालिका प्रशासनाने वाहतुकीसाठी खचलेला पूल बंद केला. वास्तविक पुराच्या पाण्यामुळे पूल खचला असला तरी पूल खचण्यासाठी आवश्यक कारणे मानवनिर्मित आहेत.
हा पूल ओलांडून हजारो नागरिक आणि या परिसरात असलेल्या शाळेतील विद्यार्थ्यांना बराच काळ दुरच्या मार्गाने ये जा करावी लागत होती. नागरिकांची गैरसोय लक्षात घेत पालिका प्रशासनाने या पुलाजवळून तात्पुरत्या स्वरूपात दुसरा पूल उभा केला आहे. मात्र तरीदेखील दिगंबर गणेश सराफ विद्यालय, देवेंद्र ओहरा महाविद्यालयातील शालेय विद्यार्थ्यांना मोठा हेलपाटा पडत आहे. त्यामुळे विद्यार्थी पाळीच खचलेला पूल ओलांडण्याची कसरत करताना दिसतात. पूल दुरुस्तीसाठी मोठा खर्च अपेक्षित आहे. सध्या पालिकेमध्ये प्रशासक राज सुरू आहे. पुलाचे बांधकाम करण्यासाठी आवश्यक प्रस्ताव आणि खर्चाची तरतूद संबंधित विभागाकडून होत नसल्याचे दिसते.
पुलाचा खचलेला भाग अधांतरी लोबकळत असून तो कधीही कोसळू शकतो, या धोक्याची जाणीव असली तरी देखील पुलावरील जीवघेणा प्रवास सुरूच आहे. या धोकादायक प्रवासाचा व्हिडिओ या भागातील सुज्ञ नागरिक मुकेश परदेशी यांनी ‘महाराष्ट्र संवाद न्यूज’कडे पाठवत प्रशासनाने हा पूल तातडीने दुरुस्त करण्यासाठी योग्य ती पावले टाकण्याची मागणी केली आहे. ‘महाराष्ट्र संवाद न्यूज’च्या वाचकांसाठी हा व्हिडिओ आम्ही येथे देत आहोत.

