महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
अहमदनगर / दौंड : पुणे जिल्ह्यात दौंड तालुक्यातील वाहणाऱ्या भीमा नदीमध्ये तीन लहान मुलांसह सात जणांचे मृतदेह सापडले आहे. एकाच कुटुंबातील सात जणांचे मृतदेह नदीत आढळल्याने पुणे आणि नगर जिल्ह्यासह राज्यभरात खळबळ उडाली आहे. प्रेम प्रकरणातून बदनामीच्या भीतीने या सर्वांनी आयुष्य संपविल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे.
मंगळवारी भीमा नदी पात्रात तीन लहान मुलांचे मृतदेह आढळले. तत्पूर्वी नदीपात्रात चार मृतदेह आढळले होते. एकाच वेळी सात मृतदेह आढळून आल्याने तपास यंत्रणा चक्रावून गेली होती. पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस तपास सुरू आहे. मोहन उत्तम पवार (वय-४५), संगीता उर्फ शहाबाई मोहन पवार (वय-४० दोघेही रा. खामगाव ता. गेवराई जि. बीड), श्याम पंडित फुलवरे (वय-२८), राणी श्याम फुलवरे (वय-२५), रितेश उर्फ भैय्या (वय-७), छोटू (वय-५) आणि कृष्णा श्याम फुलवरे (वय-३, सर्व रा. हातोला ता. वाशी, जिल्हा उस्मानाबाद) हे सर्वजण गेल्या एक वर्षापासून निघोज ता. पारनेर जि. अहमदनगर येथे मजुरीसाठी आलेले होते.
पवार पती-पत्नी हे श्याम फुलवरे यांचे सासू-सासरे असून राणी फुलवरे यांचे आई वडील होते. गेल्या पाच दिवसात टप्प्याटप्प्याने हे आढळले आहे. बुधवारी (ता. १८) पारगाव येथील मच्छीमारांना एका महिलेचा पहिला मृतदेह आढळला होता. त्यापाठोपाठ रविवारपर्यंत दोन पुरुष आणि आणखी एका महिलेचा मृतदेह आढळला. राणी फुलवरे हिच्या कपड्यांमध्ये मोबाईल व सोने खरेदीची पावती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्या दिशेने तपास केला. त्यांच्याबरोबर आणखी तीन मुले असल्याचे पोलीस तपासात नातेवाईकांकडून समोर आले.
त्यामुळे वाघोली येथील पीएमआरडीएचे शोध पथक बोलावून नदीपात्रात शोध घेण्यात आला असता तीनही मुलांचे मृतदेह आढळून आले. तपासामध्ये मोहन पवार यांना अमोल व राहुल अशी दोन मुले असून त्यापैकी अमोल हा त्यांच्यासोबत राहतो. तर राहुल हा पुण्यात असतो. अमोल याने दोन दिवसांपूर्वी नात्यातीलच एका विवाहित महिलेला पळवून आणले. या घटनेने मोहन पवार अस्वस्थ झाले. त्यांनी तिला परत सोडून येण्यास सांगितले होते. यामुळे आपली इज्जत जाईल, नाहीतर आम्ही सर्वजण विष पितो किंवा जीव तरी देतो अशा प्रकारचा इशारा त्यांनी दिला होता. मुलगा त्या महिलेला घरी सोडून न आल्यामुळे बदनामीच्या भीतीने या सर्वांनी आत्महत्या केली असल्याची माहिती समोर येत आहे.

