महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क | अहमदनगर
नाशिक पदवीधर मतदार संघ निवडणुकीसाठी अहमदनगर जिल्ह्यात सोमवारी सरासरी ५०.४० टक्के मतदान झाले असल्याची माहिती अहमदनगर निवडणूक शाखेतर्फे देण्यात आली आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील संगमनेरमध्ये एका मतदान केंद्रावर आल्या असता त्या मतदारांना हात जोडत असताना संगमनेरचे प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे यांनी त्यांना प्रचारापासून रोखण्याचा प्रकार समोर आला आहे.
विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर मतदार संघासाठी अहमदनगर जिल्ह्यात सर्वत्र मतदान प्रक्रिया अत्यंत शिस्तबद्ध व शांततेत पार पडली असल्याचे सांगण्यात आले. स्थानिक भूमिपुत्र असलेल्या अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे आणि महाविकास आघाडीने पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांच्यामध्ये प्रमुख लढत झाल्याचे दिसून आले. जिल्ह्यातील १४७ मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडली. पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी जिल्ह्यात ७९ हजार ९२३ पुरुष तर ३५ हजार ७१५ महिला असे एकूण १ लक्ष १५ हजार ६३८ मतदार होते.
त्यापैकी ४३ हजार २०६ पुरुष तर १५ हजार ०७७ महिला अशा प्रकारे ५८ हजार २८३ मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे.
२ फेब्रुवारीला या निवडणुकीत झालेल्या मतदानाची मोजणी नाशिक येथील सय्यद पिंपरी येथे होणार असल्याची माहितीही निवडणूक शाखेमार्फत देण्यात आली.
तत्पूर्वी सकाळी जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले यांनी अहमदनगर शहरातील विविध मतदान केंद्रांना प्रत्यक्ष भेट देत मतदान प्रक्रियेची पहाणी केली.
संगमनेरमध्ये ५८.९४% मतदान
संगमनेर तालुक्यातील २८ मतदान केंद्रांवर एकूण ५८.९४% मतदान झाल्याची माहिती संगमनेरचे तहसीलदार अमोल निकम यांनी महाराष्ट्र संवाद न्यूजला दिली आहे.

