महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क ● अनंत पांगारकर
शहर पोलीस ठाण्यापासून हाकेचा अंतरावरील भाग, नेहमी पोलिसांची वर्दळ, एका वृध्द महिलेला मारहाण करुन घरातील लोकांनी घराबाहेर काढले, गेल्या काही दिवसांपासून ही महिला घराबाहेर राहते, स्वत:च्या मालकीच्या घरातून घराबाहेर काढल्याने संबधीतांवर कारवाई करावी यासाठी ही महिला एकदा नव्हे तर पोलिसांकडे आर्त विनवणी करते. मात्र पोलिसांवर याचा कोणताही परिणाम होत नाही. संबधीतांवर भादवि १५४ नुसार गुन्हा दाखल करण्याऐवजी दोन्ही वेळीस एनसी दाखल करुन वेळ मारुन नेतात. परिणामी कोणाचाही चौकशी होत नाही, आणि वृध्द महिलेला न्यायदेखील मिळत नाही. ही स्थिती आहे राज्यात सुसंस्कृत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संगमनेर शहरातील.
संगमनेर शहरात गेल्या काही दिवसांपासून कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न गंभीर बनला आहे. या पार्श्वभूमीवर शहर पोलीस ठाण्याचा पदभार पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी स्विकारला. नवा अधिकारी लाभल्याने काहीतरी चांगले घडेल असा आशावादही आता नव्या निरीक्षकांच्या काळात लोप पावतोय की काय? अशी भिती नागरिकांना वाटू लागली. पोलीस ठाण्यात तक्रारी घेवून येणाऱ्या नागरिकांच्या तक्रारी ऐकण्याऐवजी त्यांना मिळणारे अजब सल्ले ऐकून चक्रावून जातात. जणु काही पोलिस ठाण्यात न्याय मिळेल या आशेने येवून चूक केली की काय असा प्रश्न तक्रारदाराला पडतो.
शहर पोलीस ठाण्यापासून काही पावलांवर एक घटना घडते. सुनेचा भाऊ, बहिण यांनी घर वृध्द महिलेच्या नांवावर असल्याच्या रागातून तिला मारहाण करण्याची आणि तिला घराबाहेर काढून देण्याची घटना पंधरा दिवसांपूर्वी घडली. महिला, तिची मुलगी आणि नातीकडील मोबाईलदेखील काढून घेण्यात आला. महिलेने पोलीस ठाण्यात येवून आपले गार्हाणे मांडले. वास्तविक पोलिसांनी संबधितांना तातडीने बोलावून वस्तुस्थितीची माहिती घेणे अपेक्षीत होते. अथवा संबधितांना महिलेची जागा बळकावून तिला मारहाण करुन घराबाहेर काढल्या प्रकरणी गुन्हा दाखल करणे अपेक्षित होते, मात्र असे काहीही न करता महिलेची एनसी दाखल करुन घेण्यात आली. आणि तपास एका महाले नांवाच्या पोलीस कर्मचाऱ्याकडे देण्यात आला. संबधित कर्मचारीदेखील रजेवर असल्याने त्यांनीदेखील यात पुढे काहीही केलेले नाही.
त्या दिवसांपासून संबधित महिला घराबाहेर आसरा मिळेल तिथे राहते. संबधितांवर कारवाईची मागणी करण्यासाठी गेल्यानंतर १ मार्चला पुन्हा महिलेच्या नांवाने एनसी दाखल करुन घेण्यात आली. मात्र अद्यापपर्यत पोलिसांकडून कोणतीही कारवाई संबधितांवर केली गेली नाही. याप्रकरणी शहरातील एका महिला वकीलाने पोलीस निरीक्षकांची भेट घेत या प्रकाराबद्दल माहिती दिली. पोलीस निरीक्षकांनीदेखील संबधितांवर चॅप्टर केस करण्याचे आश्वासन दिले. मात्र आश्वासनापलिकडे पुढे काहीही घडले नाही.
त्यामुळे पोलिस ठाण्यात सर्वसामान्य तक्रारदाराला न्याय मिळेल की नाही अशीच स्थिती निर्माण झाल्याचे सध्याचे चित्र आहे. नव्याने आलेले पोलीस निरीक्षक याप्रकरणी लक्ष घालून पोलीस दलाची मलिन झालेली प्रतिमा बदलण्यात यशस्वी होतात का? हे येत्या काही दिवसांत समोर येईल. याआधीच्या प्रभारी अधिकाऱ्यांना या पोलीस ठाण्यात फारसा रस नसल्याने त्यांनी कोणतेही ठोस काम केले नाही. नव्या निरीक्षकांनी हे चित्र बदलावे लागणार आहे.
संगमनेर शहर पोलीस ठाण्यात मथुरे नांवाचे एक अधिकारी पुर्वी येवून गेले. विशेषता तो शहरातील अति संवेदनशील दंगलीचा काळ असताना देखील त्यांनी आपल्या कार्यकाळात येथील जनतेवर आपल्या कामाची चांगलीच छाप पाडली होती. ज्या-ज्या वेळी पोलीस अधिकाऱ्यांचा विषय संगमनेरकर चर्चित असतात. त्या-त्या वेळी अन्य मोजक्या अधिकाऱ्यांसोबत या अधिकाऱ्याचे नांव आत्तापर्यत निघत. आता शहर पोलीस ठाण्यात पुन्हा एकदा या नांवाचे पोलीस अधिकारी आले आहेत. पुर्वीच्या अधिकाऱ्यांसोबत त्यांचे ऋणानुबंध असल्याची चर्चा शहरात आहे. त्यामुळे हे नवे अधिकारीदेखील त्यांच्याप्रमाणेच आपल्या कामाची छाप संगमनेरकरांत निर्माण करतील अशी आशा आहे.

