महाराष्ट्र संवाद न्यूज
शहर पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारताच गुन्हेगारीचा बिमोड करण्यासाठी पाऊले टाकणाऱ्या पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या नेतृत्वाखाली दुचाकी चोरट्यांची टोळी पकडण्यात पोलीस पथकाला यश आले आहे. एका अल्पवयीन आरोपीसह चौघा आरोपींच्या टोळीकडून पथकाने सुमारे साडेतीन लाख रुपये किमतीच्या चोरीच्या सात दुचाकी हस्तगत करण्यात यश मिळविले आहे.
गेल्या काही महिन्यांपासून गुन्हेगारांनी संगमनेर मध्ये उच्छाद मांडला आहे. तत्कालीन पोलीस अधिकाऱ्यांनी या गुन्हेगारांकडे दुर्लक्ष केल्याने या गुन्हेगारांचे मनोधैर्य वाढले असतानाच नव्या निरीक्षकांनी गुन्हेगारी नियंत्रणासाठी उचललेली पावले कौतुकास्पद ठरली आहे. नवीन निरीक्षक मथुरे आपल्या कामाची छाप संगमनेरकरांमध्ये कशा पद्धतीने पाडतात, हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईलच.
अल्पवयीन बालकासह सुमित संजय कदम (रा. निमगाव टेंभी, ता. संगमनेर), मोबीन मुबारक शेख व महंमद फरदिन नाजिर शेख, (दोन्ही रा. रेहमतनगर, संगमनेर) अशी पोलिसांनी पकडलेल्या आरोपींची नावे आहेत. या आरोपींकडून पोलिसांनी आत्तापर्यंत सात चोरीच्या मोटारसायकली हस्तगत केल्या आहे. सिन्नर आणि संगमनेरमधून या मोटारसायकलींची आरोपींनी चोरी केल्याचे कबूल केले.
संगमनेरमध्ये दुचाकी चोरीचे गुन्हे मोठ्या प्रमाणात वाढले असून दररोज दुचाकी चोरीचे सत्र सुरू आहे. त्यामुळे जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, पोलीस उपाधीक्षक संजय सातव यांनी यासंदर्भात गुन्हेगारांची माहिती काढून कारवाई करण्यासंदर्भात पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांना सूचना केल्या होत्या. मथुरे यांनी अप्पर पोलीस अधीक्षक भोर यांच्या कार्यालयातील सायबर सेलचे पोलीस कर्मचारी फुरखान शेख, पोलीस उपाधीक्षकांच्या पथकातील पोलीस कर्मचारी अण्णासाहेब दातीर, अमृत आढाव, सुभाष बोडखे, प्रमोद गाडेकर, शहर पोलीस ठाण्याचे अमित महाजन, दत्तू चौधरी यांचे पथकाला सोबत घेत आरोपीचा माग काढण्यास सुरुवात केली. ओम दीपक जानमाळी (रा. नाशिक, हल्ली संगमनेर) यांच्या चोरी गेलेल्या दुचाकीचा शोधा दरम्यान पथकाला एका अल्पवयीन दुचाकी चोरासंदर्भात संदर्भात माहिती मिळाली.
या अल्पवयीन बालकाला ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने सुमित संजय कदम यांच्यासोबत दुचाकी चोरी केल्याचे कबूल केले. तसेच या दुचाकी मोबीन मुबारक शेख, महंमद फरदिन नाजिर शेख यांना विक्री केल्याचे सांगितल्याने पथकाने त्यांनाही ताब्यात घेत त्यांच्याकडून चोरीच्या दुचाकी हस्तगत करण्यात यश मिळविले. यामुळे काही अंशी दुचाकी चोरी थांबण्याची चिन्हे निर्माण झाली आहे.

