महाराष्ट्र संवाद न्यूज
संगमनेर शहर पोलीस पथकाने मदिना नगर मधील एका वाड्यामध्ये गोवंश जनावरांची कत्तल झाल्याचे समोर आले असून पोलिसांनी सुमारे पावणे दोन लाख रुपयांचे सातशे किलो गोमांस ताब्यात घेतले आहे. पोलिसांचा छापा पडत असताना आरोपी नेहमीप्रमाणे पळून जाण्यात यशस्वी ठरला. गुढीपाडव्याच्या दिवशीच कत्तलीचा व्यवसाय राजरोसपणे सुरू असल्याचे यातून समोर आले.
संगमनेरमध्ये गोवंश हत्या बंदी कायद्याला येथील कसायांनी केराची टोपली दाखविली असून प्रशासनाच्या नाकावर टिच्चून येथील बेकायदेशीर कत्तलखाने सुरूच असल्याचे अनेकदा समोर आले आहे. आता सणासुदीला देखील नियमांचे उल्लंघन करत गोवंश जनावरांच्या कत्तली सुरूच असल्याने या व्यवसायाला नेमके आशीर्वाद कोणाचे? येत्या काही दिवसात राम नवमी आणि हनुमान जयंती सारखे सण समोर असल्याने किमान या दिवशी तरी गोवंश जनावरांच्या कत्तली थांबतील का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांना शहरातील मदिना नगरमध्ये दारुल मदिना स्कूलच्या पाठीमागे एका वाड्यात फरीद जावेद कुरेशी ही व्यक्ती जिवंत गोवंश जनावरांची कत्तल करत असल्याची माहिती मिळाली होती. त्यामुळे निरीक्षक मथुरे यांनी पोलीस पथकाला संबंधित ठिकाणी छापा टाकण्याचे आदेश दिले. पोलीस उपनिरीक्षक निवांत जाधव तसेच पोलीस कॉन्स्टेबल कानिफनाथ जाधव, दाभाडे, गवळी, उगले यांच्या पथकाने छापा टाकला असता तेथे मोठ्या प्रमाणात जिवंत गोवंश जनावरांची कत्तल केल्याचे आढळून आले. तर छापायचे चाहूल लागल्याने कत्तलखाना चालक अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला.
पोलिसांनी घटनास्थळी पशुवैद्यकीय अधिकारी संगमनेर यांना बोलवून घेतले आणि सदर मांसाची तपासणी केली असता सुमारे ७०० किलो वजनाचे १ लाख ७५ हजार रुपयांचे गोवंश मांस तेथे आढळून आले. पोलीस तपासात पळून जाणाऱ्या व्यक्तीचे नाव फरीद जावेद कुरेशी (रा. जमजम कॉलनी, संगमनेर) असे असल्याचे निष्पन्न झाले असून घटनास्थळावरून पोलीस पथकाने सुमारे पावणे दोन लाख रुपये किमतीचे सातशे किलो गोवंश जनावरांचे गोमांस ताब्यात घेतले.
पोलीस कॉन्स्टेबल कानिफनाथ जाधव यांनी यासंदर्भात दिली असून पोलिसांनी फरिद जावेद कुरेशी (रा. जमजम कॉलनी, संगमनेर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस नाईक गायकवाड पुढील तपास करत आहे.

