सोनई (महाराष्ट्र संवाद न्यूज)
माजी मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुरलेले राजकारणी नाहीत. गद्दारांच्या खेळीला वैतागून त्यांनी राजीनाम्याचा निर्णय घेतला असला तरी येणाऱ्या निवडणुकीत जनता उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीला साथ देईल असा विश्वास माजी खासदार यशवंतराव गडाख यांनी व्यक्त केला.
अहमदनगर जिल्ह्यातील दिग्गज राजकारणी आणि संयमी नेते म्हणून ओळख असलेल्या साहित्यिक यशवंतराव गडाख यांच्या वाढदिवसानिमित्त माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शुक्रवारी त्यांच्या भेटीला आले होते. ठाकरे-गडाख भेटीत गडाख यांनी ठाकरेंचे तोंड भरून कौतुक करत ठाकरे आणि पवार यांच्यासोबतच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला.
गडाख म्हणाले, ठाकरे कुटुंबाशी आमची मैत्री जुनी आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि माझे संबंध मैत्रीपूर्ण होते. तेच संबंध पुढील काळात उद्धव ठाकरे यांच्या सोबत आहे. उद्धव ठाकरे यांनी जेष्ठांना डावलत शंकररावांना मंत्रीपद दिले. त्यामुळे त्यांची साथ सोडायची नाही, त्यांच्यासोबत ठामपणे राहायचे असा सल्ला आपण शंकररावांना दिला होता.
विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेला आमदारांची जमवाजमव करायची होती, तेव्हा त्यांनी आमच्याकडे आमदार शंकरराव गडाख यांच्या पाठिंबाबद्दल विचारणा केली. त्यानंतर आमदार शंकरराव गडाख यांनी मुंबईला जात उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. आम्ही ठाकरे यांच्या सोबत जाण्याचा निर्णय घेतला. मंत्रीपद द्या किंवा नका देऊ आम्ही तुमच्या सोबत राहू असा शब्द ठाकरे यांना मी दिला होता.
राज्यात नंतर महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आले. उद्धव ठाकरे स्वतः मुख्यमंत्री झाले त्यांनी आमच्या पाठिंबाची जाणीव ठेवत पक्षातील ज्येष्ठांना डावलून शंकररावांना मंत्रिपद दिले. त्यामुळे ठाकरे यांच्यासोबत ठामपणे राहायचे असा सल्ला मी शंकररावांना दिला. मधल्या काळात अनेक प्रलोभने आले मात्र तरीदेखील आम्ही ठाकरे यांची साथ सोडली नसल्याचे गडाख म्हणाले.
२०२४ नंतर पवार देशाचे पंतप्रधान
आत्तापर्यंत शरद पवारांना पंतप्रधान पद मिळू शकले नाही. सध्या देशात त्यांच्या एवढा दुसरा अनुभवी नेता नाही. परिस्थिती बदलली तर २०२४ नंतर ते देशाचे पंतप्रधान होऊ शकतात. वयाची ८० वर्षे पार केल्यानंतर देखील पवार राजकारण आणि समाजकारण सक्रिय आहेत. त्यांची कारकीर्द संघर्षमय राहिली आहे. आजही ते लोकांमध्ये जातात, या वयात अशी हिम्मत दाखविणारे कदाचित ते शेवटचे नेते ठरतील. राज्याच्या नव्हे तर देशाच्या राजकारणातही त्यांचे वजन आहे.
२०२४ नंतर ते देशाचे पंतप्रधान होऊ शकतात आत्तापर्यंत दिल्लीतील काँग्रेसमधील चौकडीने त्यांच्याबद्दल श्रेष्ठींचे कान भरले. त्यामुळे या पदासाठी त्यांचे नाव मागे पडत असे. आम्ही मात्र त्यांच्यासोबत कायम राहिलो.

