महाराष्ट्र संवाद न्यूज
दुचाकी आणि दागिन्यांच्या चोऱ्या नित्याच्याच झालेल्या संगमनेरमध्ये आता दिवसाढवळ्या नागरिकांवर लक्ष ठेवत रोकड पळविण्याच्या घटना सुरू झाल्या आहे. अशीच सात लाखाची रोकड पळविण्याच्या नादात तिघांपैकी दोघा बिहारींना पकडण्यात यश आले आहे.
गेल्या काही वर्षातील अकार्यक्षम पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांमुळे संगमनेरमध्ये चोरट्यांचे चांगलेच फावले आहे. चोरी केल्यानंतर पकडले जात नसल्याने या चोरट्यांचे मनोधैर्य वाढले आहे. नव्याने पोलीस ठाण्याचा पदभार घेतलेल्या निरीक्षक भगवान मथुरे यांना या चोरट्यांचा बिमोड करण्यासाठी पावले टाकावी लागणार आहे. त्यामुळे गुन्हेगारी जगताशी अवैध व्यावसायिकांशी अर्थपूर्ण लागेबंधे निर्माण झालेल्या कर्मचाऱ्यांना या पोलीस ठाण्याबाहेरचा रस्ता दाखवत नवी टीम त्यांना उभे करावी लागणार आहे.
बस स्थानक, सीसीटीव्हीच्या नियंत्रणाखालील भाग चोरट्यांचे मुख्य केंद्र बनलेला असतानाच आता कृषी उत्पन्न बाजार समिती येथेही चोरटे हात मारू लागल्याचे दिसते. बुधवारी दुपारी एक ते दीड वाजण्याच्या सुमारास पांडुरंग यशवंत शेटे (रा. मालदार रोड, सुकेवाडी) हे काही कामानिमित्त संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आले होते. आपल्या मोटारसायकलच्या डिक्कीत ठेवलेले रोख ७ लाख रुपये ते बाहेर काढत असताना त्यांच्यावर लक्ष ठेवून असलेल्या तीन आरोपींनी हातातील पैसे बळजबरीने ओढून घेऊन पळ काढला.
त्यांनी दाखविलेल्या सतर्कतेमुळे जबरी चोरी करणाऱ्या तीन आरोपीपैकी दोघांना पकडण्यात यश आले असून एक जण ३० हजार रुपये घेऊन पळून गेला आहे. अन्नुकुमार अवदेश यादव व अमनकुमार जगन यादव (राहणार नयाटोला, जोराबगंज, तालुका कोढा, जिल्हा कटिहार, बिहार) या दोघांना अटक करण्यात आली असून त्यांचा तिसरा साथीदार (नाव माहित नाही) पळून गेला आहे. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या दोन आरोपींकडून सात लाखापैकी तीस हजार रुपये वगळता उर्वरित ६ लाख ७० हजार रुपये हस्तगत केले आहेत.
शेटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संगमनेर शहर पोलिसांनी जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस करत आहेत.

