महाराष्ट्र संवाद न्यूज
ज्यावेळी उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळात अशी घटना घडली, तेव्हा सर्वांनी त्यांना सांभाळून घेतले होते, त्यामुळे विरोधकांनी आळंदीतील प्रकरणावरून राजकारण करू नये, असा सल्ला चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला आहे.
मंदिरात प्रवेश देण्याच्या कारणावरून रविवारी आळंदीमध्ये पोलीस आणि वारकऱ्यांमध्ये वाद झाला हा वाद एवढा विकोपाला गेला की शेवटी पोलिसांना वारकऱ्यांवर लाठीचार्ज करावा लागला. या घटनेचे व्हिडीओदेखील समोर आले आहेत. तर वारकऱ्यांवर कोणताही लाठीहल्ला करण्यात आलेला नाही, असे राज्याचे गृह मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सांगण्यात आलेले आहे.
यानंतर विरोधकांकडून राज्य सरकारवर चांगलीच टीका करण्यात येत आहे. याच मुद्द्यावरून संगमनेरमध्ये देखील शिवसेनेच्या ठाकरे गटाने सरकार विरोधात सोमवारी सकाळी निषेध आंदोलन केले. आळंदी प्रकरणाचे पडसाद सर्वत्र उमटण्याची चिन्हे निर्माण झाले असतानाच या मुद्द्यावरून आता चंद्रशेखर बावनकुळे यांनी विरोधकांना सल्ला दिला आहे. विरोधकांनी या मद्द्यावरून राजकारण करू नये.
माध्यमांशी बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, ज्यावेळी उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री आणि अजित पवार हे उपमुख्यमंत्री होते, तेव्हा यापेक्षा भयंकर घटना घडली होती. चेंगराचेंगरी झाली होती. त्यामुळे या ठिकाणी पुन्हा एकदा अशी घटना घडू नये, याकरिता सरकारकडून काही सुचना करण्यात आलेल्या आहेत. या घटनेची संपूर्ण माहिती देवेंद्र फडणवीस यांच्याकडून देण्यात आलेली आहे.
सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये नवीन बदल झाले आहेत. त्यामुळे नवीन जबाबदारी नवीन लोकांना देण्यात आल्याने ते सध्या उत्साहात आहेत, असा टोला लगावत जर का सरकारकडून काही आवाहन करण्यात आले असेल तर ते स्विकारले पाहिजे, असेही बावनकुळे यांच्याकडून सांगण्यात आले आहे.
धार्मिक वाद निर्माण करण्यासाठी भाजपकडून टोळ्यांची निर्मिती
याच मुद्द्यावरून ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी देखील भाजपवर गंभीर आरोप केला आहे. धार्मिक वाद निर्माण करण्यासाठी भाजपकडून टोळ्यांची निर्मिती करण्यात आली आहे. भाजप प्रत्येक ठिकाणी आपली राजकीय मस्ती दाखवत आहे. त्र्यंबकेश्वर, शेगाव, संगमेश्वर या ठिकाणी काही तरी धार्मिक वाद निर्माण करून वातावरण तापवण्याचे काम करण्यात आले आहे. भाजपने तयार केलेल्या टोळ्या या धार्मिक ठिकाणी घुसून धार्मिक तणाव निर्माण करण्याचे काम करत आहे. तर सरकारला शासकीय पूजा करण्याचा हक्क नाही, असेही राऊत यांच्याकडून सांगण्यात आले आहे.

