राहात्यामध्ये प्रचंड विराट सभा
गणेश परिसराच्या विकासाचा प्रामाणिक हेतू : थोरात
महाराष्ट्र संवाद न्यूज
ज्यांना स्वतःचा कारखाना नीट चालवता येत नाही ते गणेश चांगला कसा चालवणार. त्यांची दडपशाही झुगारून सभासद व जनतेचा मोठा पाठिंबा या निवडणुकीत मिळवला असून ही निवडणूक गणेश परिसरातील शेतकऱ्यांची अस्मिता व स्वातंत्र्य टिकवण्यासाठी आहे. आमचा हेतू हा स्वच्छ व प्रामाणिक असून शेतकरी व कामगारांच्या विकासासाठी कटिबद्ध असून या परिसरातील हुकूमशाही हटवण्यासाठी परिवर्तन आवश्यक असल्याचे प्रतिपादन आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले. तर स्वर्गीय शंकररावजी कोल्हे यांचा छावा सदैव तुमच्यासोबत असेल असे युवा नेते विवेक कोल्हे यांनी म्हटले आहे
राहता येथे श्री गणेश परिवर्तन पॅनलच्या प्रचारार्थ सभेत ते बोलत होते. यावेळी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, सहकार महर्षी शंकरराव कोल्हे कारखान्याचे चेअरमन विवेक कोल्हे, रामचंद्र बोठे, सचिन गुजर, करण ससाने, डॉ. एकनाथ गोंदकर, सुधीर मस्के, प्रभावतीताई घोगरे, सुरेश थोरात, अविनाश दंडवते, ॲड. नारायणराव कार्ले, शिवाजीराव लहाने आदींसह विविध पदाधिकारी उपस्थित होते.
थोरात म्हणाले, संगमनेर आणि संजीवनी हे कारखाने आदर्शवत आहेत. गणेश कारखान्याने वैभवाचे दिवस पाहिले. मात्र त्यांच्या हातात सत्ता गेल्याने या कारखान्याची प्रगती थांबली आहे. ज्यांना स्वतःचा कारखाना नीट चालवता येत नाही ते गणेश काय चालवणार? निळवंडेसाठी आपण कष्ट केले. पाणी सोडल्यानंतर शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये आनंद निर्माण झाला. शेतकरी मोठ्या आनंदाने पाणी पूजन करतात हे त्यांना पाहवत नसल्याने घाईघाईने पाणी बंद केले.
या परिसरात मोठे दबावाचे व भीतीचे वातावरण असून त्यांच्या दहशतीचे झाकण जनतेने उडून दिले आहे. सभेसाठी परवानगी नाकारली मात्र जनता उत्स्फूर्तपणे परिवर्तनाच्या लाटेत सहभागी झाली असून अत्यंत मोठ्या संख्येने आज सभासद उपस्थित आहेत. स्वातंत्र्य व अस्मिता टिकवण्यासाठी ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची असून गणेश परिसरातील नागरिकांच्या विकासाचा प्रामाणिक हेतू आमचा आहे. त्यांचा हेतू चांगला नव्हता म्हणून गणेश चालला नाही असा टोलाही त्यांनी विखे यांना लगावला आहे.
विवेक कोल्हे म्हणाले, अमृत आणि संजीवनी एकत्र येऊन गणेश चालवणार आहेत. सहकार महर्षी शंकरराव कोल्हे यांचा समृद्ध वारसा आपण जपला असून सिंह आपल्यात नाही .परंतु त्यांचा छावा सदैव आपल्यासोबत आहे. शेतकऱ्यांच्या विकासासाठी आपण कायम कटिबद्ध असून गणेश परिसरातील जनतेला कधीही वाऱ्यावर सोडणार नाही असे सांगत विखेंच्या दडपशाहीवर त्यांनी टीका केली.
प्रभावती घोगरे म्हणाल्या, राहता तालुक्यात विखे घराण्याची मोठी दडपशाही व हुकूमशाही आहे .या हुकूमशाहीला घाबरू नका. शेजारधर्म काय असतो ते आम्हाला विचारा, ते परिसरात कोणालाही मोठे होऊ देत नाही. अगदी पान टपरीच्या उद्घाटनालाही त्यांनाच बोलवावे या दडपशाविरुद्ध एकत्र येत सर्वांनी आमदार थोरात व कोल्हे यांच्या पाठीशी उभे राहताना सत्ताधाऱ्यांची हुकूमशाही जमीनदोस्त करा असे आवाहन केले.
यावेळी डॉ. एकनाथ गोंदकर, सुहासराव वहाडणे, करण ससाने, आदींसह विविध पदाधिकाऱ्यांची भाषणे झाली. प्रास्ताविक शिवाजीराव लहारे यांनी केले. लताताई डांगे, अरुण पा. कडू, बाळासाहेब विखे, सचिन कोते, रावसाहेब बोठे, धनंजय गाडेकर, समीर करमासे, शितल लहारे आदींसह शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आ. थोरात यांच्या सभेला प्रचंड जनसमुदाय
वीरभद्र मंदिराच्या समोरील प्रांगणात सभेसाठी परवानगी नाकारल्यानंतर मंदिराशेजारील मैदानावर हजारोंच्या उपस्थितीमध्ये मोठी सभा झाली. सुरुवातीपासून शेवटपर्यंत एकही सभासद न हलता शांततेत झालेल्या या सभेने श्री गणेश परिवर्तन मंडळात मोठे चैतन्य निर्माण झाले असून विरोधकांमध्ये मोठी धास्ती निर्माण झाली आहे.

