महाराष्ट्र संवाद न्यूज
संगमनेर – आमदार बाळासाहेब थोरात यांच्या सततच्या कामातून संगमनेर तालुका व शहर हे देशासाठी विकासाचे मॉडेल ठरले आहे. म्हाळुंगी नदीवरील पुलासाठी आमदार थोरात यांनी 30 नोव्हेंबर 2022 रोजी दिलेले पत्र व केलेल्या पाठपुराव्यातून या पुलासाठी 4 कोटी 50 लाख रुपयांचा निधी मिळाला असल्याची माहिती काँग्रेसचे शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे यांनी दिली आहे.
दिवटे म्हणाले, ऑक्टोबर 2022 मध्ये म्हाळुंगी नदीवरील पूर पाण्याने खचला होता. हा पूल घोडेकर मळा, पंपिंग स्टेशन, ओहरा महाविद्यालय, गंगामाई घाट, साईनगर या सर्वांकरता अत्यंत महत्त्वाचा होता. हा पूल खचल्याने नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांनी तातडीने पुलाची पाहणी करून नागरिकांना दळणवळणाची व्यवस्था करून दिली.
या पूलाच्या उभारणी कामाकरता आमदार बाळासाहेब थोरात यांनी 30 नोव्हेंबर 2022 रोजी मुख्यमंत्री महोदयांकडे पुलाच्या कामासाठी 4 कोटी 50 लाख रुपयांच्या निधीची मागणी केली व या निधीसाठी सातत्याने पाठपुरावा केला. यावरून याकामी हा निधी मिळाला आहे.
आमदार थोरात यांनी पाठपुरावा केल्याने हा निधी मिळत आहे. आ. थोरात यांना या निधीचे श्रेय जाऊ नये, यासाठी सत्तेचा वापर करून काही मंडळी या निधीमध्ये आडकाठी निर्माण करत होती. अगदी मंत्रालय पातळीवर जाऊन हा पूल होऊ नये म्हणून प्रयत्न करण्यात आले. ज्या लोकांना विकासाचे कोणतेही काम करता येत नाही. असे स्थानिक पुढारी विकासात आडकाठी निर्माण करतात.
त्यांच्या सांगण्यावरून इतरांनी चार-पाच महिने उशिराने नावापुरते पत्र दिले आहेत. फक्त पत्र देणे आणि पाठपुरावा करणे यामध्ये मोठा फरक असून हे काम फक्त आ. थोरात यांनीच केले आहे. हे सर्व जनतेला माहित आहे.
त्यामुळे इतरांनी पत्रकबाजी करून श्रेय घेण्याच्या केविलवाणा प्रयत्न करू नये, असे आवाहनही दिवटे यांनी केले आहे. 

