महाराष्ट्र संवाद न्यूज
अहमदनगर – नगर जिल्ह्याच्या राजकारणामध्ये कोणत्याही नेत्याने दुसऱ्याच्या कारखान्याच्या कार्यक्षेत्रात हस्तक्षेप करायचा नाही, असा अलिखित करार आहे. ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात आणि भारतीय जनता पार्टीच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी गणेश कारखान्याच्या निवडणुकीत एकत्र येत हा करार मोडला आहे. त्यांचे पुढे काय करायचे हे ठरवू, असा सूचक इशारा महसूल मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला आहे.
श्री गणेश सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी शनिवारी (ता. १७) मतदान होत आहे. माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात आणि माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी या निवडणुकीत लक्ष घातले आहे. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पॅनल विरोधात त्यांनी गणेशमध्ये परिवर्तनासाठी स्वतंत्र पॅनल उभा केला आहे. या पॅनलच्या माध्यमातून आमदार थोरात आणि संजीवनी कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी विखे यांच्यासमोर तगडे आव्हान निर्माण केले आहे.
या पार्श्वभूमीवर अहमदनगरमध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कार्यक्रमानंतर बोलताना विखे यांनी म्हटले आहे की, गणेश कारखाना निवडणुकीत उतरून थोरात व कोल्हे यांनी करार मोडला आहे. त्यामुळे त्यांचे पुढे काय करायचे हे ठरवू. यावेळी त्यांनी जिल्हा निर्मिती आणि भाजप अंतर्गत नाराजीवरही भाष्य केले.
भाजपमधील निष्ठावंत यांच्या नाराजीबद्दल आपण त्यांच्याशी चर्चा करू. पालकमंत्री म्हणून संघटनात्मक समन्वय साधण्याचे दायित्व माझ्यावर आहे. पक्ष संघटनेला बळ मिळण्यासाठी व शासकीय योजनांना गती मिळण्यासाठी “शासन आपल्या दारी” या योजनेची नगर शहरातील अंमलबजावणीची जबाबदारी शहरातील पदाधिकाऱ्यांवर दिली जाणार असल्याचे ते म्हणाले.
श्रीरामपूरच्या आंदोलनात मला राजकारण दिसते…
जिल्हा विभाजन आणि शिर्डीमध्ये नव्याने मंजुरी देण्यात आलेले अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालय याचा काहीही संबंध नाही. जिल्हा निर्मितीचा हा निर्णय नाही. जिल्ह्यातील पाच-सात तालुक्यांसाठी शासकीय कामांच्या दृष्टीने सोयीचे ठरावे याकरिता शिर्डीमध्ये अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालयाचे निर्मिती केली आहे. ज्यांच्याकडे सात-आठ वर्षे महसूल मंत्रीपद होते. त्यांनी या सुविधेसाठी पाऊले उचलले नाही, विरोधात आंदोलन करत असलेल्यांनी त्यासाठी कधीच भूमिका घेतली नाही. त्यामुळे श्रीरामपूरला सुरू असलेल्या या कार्यालयाविरोधातील आंदोलनात मला राजकारण दिसत आहे, असा टोला माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचे नाव न घेता लगावला.

