महाराष्ट्र संवाद न्यूज
मुंबई :- काँग्रेसला मत देणे म्हणजे देशात अराजकता निर्माण करणे असल्याचे मत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले आहे.
बावनकुळे म्हणाले, राहुल गांधींनी भारत जोडो यात्रेदरम्यान स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान केला आणि आता कर्नाटक सरकारला आदेश देऊन त्यांनीच अभ्यासक्रमातील स्वातंत्र्यवीर सावरकरांचा धडा काढायला लावला. काँग्रेसने कर्नाटकात धर्मांतर बंदी कायदा रद्द केला असून भविष्यात गोहत्या बंदीचा कायदाही रद्द करतील. त्यामुळे काँग्रेसला दिलेलं एक मत म्हणजे किती मोठी चूक आहे, याचं कर्नाटक उदाहरण असल्याचे बावनकुळे म्हणाले.
कर्नाटकच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरेंनी भूमिका स्पष्ट करावी
किमान आता तरी उद्धव ठाकरे यांनी लंडनमधून भूमिका स्पष्ट करावी. कर्नाटकमध्ये झालेला प्रकार त्यांना मान्य आहे का? उद्धव ठाकरे भविष्यातही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँगेसच्या मांडीला मांडी लावून बसणार आहेत का? हे त्यांनी महाराष्ट्रातील जनतेला सांगावे अशी मागणीही त्यांनी केली.
दरम्यान उद्धव ठाकरे यांच्याशी पुन्हा मैत्रीसंदर्भात उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री मौर्य यांनी जे वक्तव्य केले आहे, ते त्यांचे वैयक्तिक मत आहे. उद्धव ठाकरे यांच्यासाठी आता आमचे दार बंद आहे. आम्ही त्यांच्याशी कुठलीही चर्चा करणार नाही. आमची त्यांच्याशी कुठलीही चर्चा सुरु नाही. देवेंद्र फडणवीस हेच महाराष्ट्रातील क्रमांक एकचे नेते असल्याचे स्पष्टीकरण ही बावनकुळे यांनी दिले.

