महाराष्ट्र संवाद न्यूज
पिंपरी – आम्ही मजबूत असून सरकारची काही काळजी करू नका. असे सांगताना “एखाद्या जाहिरातीमुळे युतीवर परिणाम होईल एवढी युती कच्ची नाही”, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.
पिंपरी-चिंचवडमध्ये आयोजित ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. शुक्रवारी थेरगाव येथे झालेल्या या कार्यक्रमासाठी खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेश लांडगे, अश्विनी जगताप, उमा खापरे, माजी आमदार संजय भेगडे, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, ‘पीएमआरडीए’चे आयुक्त राहुल महिवाल, महापालिका आयुक्त शेखर सिंह, पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे आदी यावेळी उपस्थित होते.
शिंदे म्हणाले, शिवसेना भारतीय जनता पक्षाची युती एका विचाराने झालेली आहे. बाळासाहेब ठाकरे, अटलबिहारी वाजपेयी, प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे यांच्या संकल्पनेतून ही युती पुढे आली असून एखाद्या जाहिरातीमुळे तिच्यावर परिणाम होणार नाही. एवढी ती कच्ची नाही.
राज्यात मी आणि देवेंद्र फडणवीस चांगले काम करीत असून धाडसी निर्णय घेणारे हे सरकार आहे. जनतेच्या हिताचे निर्णय घ्यायचे हेच माझे आणि सरकारचे काम आहे. आमचे सरकार खोटी आश्वासने देत नाही. राज्यात आतापर्यंत 35 लाख नागरिकांपर्यंत सरकार पोहोचले आहे. 104 शिबिरांच्या माध्यमातून 286 कोटी रुपयांचा लाभ आत्तापर्यंत नागरिकांना देण्यात आला आहे.
प्रशासनाने लोकप्रतिनिधीचे ऐकले पाहिजे. लाखो लोकांमधून लोकप्रतिनिधी निवडून येतात, त्यामुळे अधिकाऱ्यांनी इगो ठेवू नये. दोघांनी एकत्रित काम करण्याची आवश्यकता आहे, असेही त्यांनी सांगितले.

