महाराष्ट्र संवाद न्यूज
राज्याच्या मंत्रिमंडळात नव्या मंत्र्यांचा समावेश होऊन आठवडा उलटला तरी सरकारचे खातेवाटप अद्याप जाहीर झालेले नाही. शिंदे-फडणवीस-पवार सरकारमध्ये खाते वाटपावरून मोठा पेच निर्माण झाल्याने खाते वाटपाचा तिढा आता दिल्लीत सोडविला जाणार आहे. त्यासाठी शिंदे फडणवीस पवार दिल्लीला जाणार आहेत.
अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची तर त्यांच्या सहकाऱ्यांनी मंत्रीपदाची शपथ घेऊन आठवडाभराचा कालावधी उलटून गेला आहे. मात्र उपमुख्यमंत्र्यांसह नव्या मंत्र्यांना अद्याप कोणतेही खाते देण्यात आले नसल्याने सध्या हे सर्वजण बिन खात्याचाच कारभार हाकत आहे. वास्तविक नव्या मंत्र्यांना दोन दिवसात खातेवाटप जाहीर होणे अपेक्षित होते. मात्र शिंदे-फडणवीस-पवार सरकारमधील अंतर्गत कलहामुळे अद्याप खातेवाटप जाहीर होऊ शकले नाही.
मंत्रिमंडळाचा विस्तार आणि खाते वाटपाचा तिढा अद्यापही कायम असल्याने खाते वाटपानंतर मंत्र्यांची संख्या ठरण्याची चिन्हे आहेत.
सध्या शिंदे-फडणवीस-पवार सरकारमध्ये भाजपकडे अर्थ खाते आहे. भाजपकडील अर्थ खाते अजित पवार यांना देण्यास शिंदे गटाचा विरोध आहे. तसेच गृह खाते फडणवीस यांच्याकडे कायम राहणार आहे. तर भाजपकडे म्हणजेच विखे यांच्याकडे असलेले महसूल खाते देखील काढून विखे पाटलांची नाराजी भाजपला परवडणारी नसल्याने भाजपची मोठी कोंडी झाली आहे. शिवाय मुख्यमंत्री शिंदे यांच्या गटाकडे असलेले महत्त्वपूर्ण खाते सोडण्यास शिंदे गट तयार नाही. आपल्या वाट्याचं एकही मंत्रीपद राष्ट्रवादीला देण्यास शिंदे गट तयार नाही. राष्ट्रवादीच्या मंत्र्यांचा अनुभव लक्षात घेता त्यांनाही वजनदार खाते हवे आहेत. यामुळे नव्या मंत्रिमंडळाच्या खाते वाटपाचे धर्मसंकट भाजपसमोर उभे राहिल्याने आता हा प्रश्न दिल्लीत सोडविला जाणार आहे.
खाते वाटपाचा तिढा दिल्ली दरबारात गेल्याने मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस-पवार आता दिल्लीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन हा तिढा सोडविण्याचा प्रयत्न करणार आहे, अशी माहिती समोर येत आहे. त्यामुळे शहा यांच्यासोबतच्या बैठकीत खाते वाटपाचे कोणते सूत्र समोर येते, याबाबत लक्ष लागला आहे.

