महाराष्ट्र संवाद न्यूज
मुंबई – राज्यात शिंदे-फडणवीस-पवार सरकार सत्तेत असले तरी त्यांच्यात सर्व काही आलबेल नाही. अजित पवारांसह राष्ट्रवादीच्या नऊ आमदारांनी शपथ घेतली असली तरी त्यांना अद्याप खाते वाटप करण्यात आले नाही तसेच मंत्रिमंडळ विस्तार देखील रखडला आहे. यामुळे तिन्ही पक्षाचे आमदार नाराज असल्याने या पार्श्वभूमीवर आता महायुतीने तीन पक्षांच्या समन्वयासाठी १२ जणांच्या समन्वय समितीची स्थापन केली आहे. भाजप आमदार प्रसाद लाड हे या समितीचे प्रमुख समन्वयक आहेत.
खाते वाटप आणि मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांमध्ये आत्तापर्यंत बैठकांचा सिलसिला सुरू आहे. चर्चेच्या फेऱ्या होत असल्या तरी देखील अंतिम निर्णय समोर येताना दिसत नाही. तसेच अर्थ खाते राष्ट्रवादीला देण्यास शिंदे गटाने आक्षेप घेतल्याने, आपल्या वाट्याची मंत्रिपदे कमी होऊ नये त्यासाठी शिंदे गटाने थेट विरोधाची भूमिका घेतल्याने भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या आमदारांमधील नाराजी समोर येऊ लागली आहे.
महायुतीत खातेवाटपावरून सर्व काही आलबेल नसल्याचे बोलले जात आहे. त्यातच आमदार बच्चू कडू यांनी तीन इंजिनचे सरकार कधीही कोसळू शकते, असे वक्तव्य केले. गेल्या एका वर्षापूर्वी राज्यात शिंदे-फडणवीस सरकार अस्तित्वात आले. मात्र, आता राष्ट्रवादीचा अजित पवार गट सत्तेत सहभागी झाल्याने सध्या राज्यात तीन पक्षाचे सरकार आहे. सत्तेत नवा वाटेकरी आल्याने शिंदे गट नाराज आहे.
या पार्श्वभूमीवर महायुतीच्या सरकारमधील तीनही पक्षांमध्ये समन्वय साधण्यासाठी एका समन्वय समितीची घोषणा करण्यात आली आहे. शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी या तीनही पक्षांमधील प्रत्येकी चार सदस्यांचा समावेश या समितीत असणार आहे. बारा सदस्य असलेली ही समिती आमदारांमध्ये समन्वय साधण्याचे काम करेल.
यांचा आहे समितीत समावेश…
भाजपमध्ये प्रसाद लाड हे समन्वयक म्हणून काम पाहतील. तसेच प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनुकळे, मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार प्रसाद लाड, आमदार आशिष शेलार यांचा समावेश आहे. तर शिवसेना (शिंदे गट) कडून मंत्री उदय सामंत, शंभूराज देसाई, दादा भुसे, राहुल शेवाळे हे समन्वय प्रमुख म्हणून काम पाहणार आहेत. तर राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडून सुनील तटकरे, छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील, धनंजय मुंडे यांचा समन्वय समितीत समावेश आहे.


