महाराष्ट्र संवाद न्यूज
मुंबई – न्यायालयाचा निकाल, अध्यक्षांचा निकाल यामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला असं वाटत होतं. मात्र आता असं वाटतंय की, राष्ट्रवादीमुळेच हा मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला होता. काँग्रेस हा एकच पक्ष आता शिंदे-फडणवीस-पवार सरकारमध्ये येणं बाकी आहे तोही आला तर काय हरकत आहे असा प्रश्न आमदार बच्चू कडू यांनी उपस्थित करत अजित दादा मुख्यमंत्री होतील याला मी होही म्हणू शकत नाही आणि नाही सुद्धा म्हणू शकत नाही, सध्या अंदाजाच्या पलीकडे राज्याच राजकारण गेलं आहे. त्यांच्या या वक्तव्याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
राज्यात शिंदे-फडणवीस सरकार सत्तेमध्ये येऊन एक वर्षाचा कालावधी उलटून गेला तरी देखील भाजप शिवसेना मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. या पार्श्वभूमीवर आमदार बच्चू कडू यांनी केलेले विधान महत्त्वाचे मानले जात आहे.
वर्षभराच्या कालावधीत शिवसेना-भाजप सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार करण्याच्या मागणीवर अनेकदा शिंदे गटातील आमदारांनी भाष्य केले. याशिवाय आमदार बच्चू कडू यांनी देखील अनेकदा आपले नाराजी व्यक्त केली होती. आताही त्यांनी मंत्रिमंडळाचा का विस्तार होऊ शकला नाही, मंत्रिमंडळाचा विस्तार का लांबला यावर महत्त्वाचे भाष्य केले.
कडू म्हणाले, गाडी, घोडा, बंगला असूनही आज राजकीय नेते अस्थिर आहे. आता जे समोर आहे, त्याला शिंदे साहेबांवर विश्वास ठेवून सामोरे जायचं आहे. मागून आलेल्या राष्ट्रवादीला झुकत माप दिलं जातंय. त्यामुळे आमच्या नशिबी काय येतंय ते बघू असे सांगत त्यांनी देखील आपण ‘वेट अँड वॉच’वर असल्याचे स्पष्ट केले.

