महाराष्ट्र संवाद न्यूज
शिर्डी – श्रीरामपूर उप प्रादेशिक परिवहन (आरटीओ) कडून खाजगी प्रवासी बसेसची विशेष तपासणी मोहीम सुरू आहे. या मोहिमेत अवघ्या पंधरा दिवसातच 140 वाहने दोषी आढळून आली असून दंडापोटी 6,18,260/-रुपये वसूल करण्यात आल्याची माहिती सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी गणेश डगळे यांनी दिली आहे.
या मोहिमेत 16 जुलै अखेर 350 बसेसची तपासणी करण्यात आली. या विशेष मोहीमेत मद्य प्रशासन करुन वाहन चालविणाऱ्या चालकांची तपासणी करणे, वेग नियंत्रकामध्यें छेडछाड करणे, अग्निशमन यंत्रणा नसणे, विना परवाना अथवा परवान्याच्या अटींचा भंग करणारी वाहने, क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक, अवैध मालवाहतूक करणाऱ्या बसेस, वाहनांमध्ये बेकायदेशीर केलेले फेरबदल, आपत्कालीन निर्गमन आणि दरवाजे कार्यरत स्थितीत नसणाऱ्या, योग्यता प्रमाणपत्र नसणे, जादा भाडे आकारणी, रिफ्लेक्टर टेप नसणे, इंडिकेटर, टेल लाईट, वापर इ. मोटार वाहन कायद्यातील गुन्हयानुसार तपासणी केली जात आहे.
खाजगी बस तपासणी मोहीम या पुढेही सुरु राहणार आहे. त्यामुळे, वाहन धारकांनी मोटार वाहन नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. तसेच, खाजगी बसेसमध्ये काही त्रुटी आढळून आल्यास प्रवाशांनी श्रीरामपूर उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाशी संपर्क साधावा. असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी उर्मिला पवार यांनी केले आहे.

