हप्ते वसुली करणाऱ्या सरकारी टोळ्यांवर काय कारवाई केली?
बोगस बियाणे आणि खतांचा मुद्दा विधानसभेत गाजला
काँग्रेसने सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडले
बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार यांच्या आक्रमक पवित्र्यापुढे सत्ताधाऱ्यांची भंबेरी
महाराष्ट्र संवाद न्यूज
मुंबई : आंतरराष्ट्रीय बाजारात खतांच्या किंमती कमी झालेल्या असतानाही केंद्र सरकारकडून खतांच्या बाबतीमध्ये नफेखोरी सुरू आहे, शेतकऱ्याला मदत करायची सोडून हा कसला प्रकार सुरू आहे आणि कृषिमंत्री केंद्र सरकारची ही नफेखोरी कबूल करायला का तयार नाही? आपण कोणाला घाबरता? असा सवाल करून काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी कृषिमंत्री धनंजय मुंडे यांना चांगलेच कोंडीत पकडले.
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज तिसरा दिवस होता. प्रश्नोत्तराच्या तासात बोगस बी बियाणे आणि खतांच्या वाढलेल्या किंमतीवरून काँग्रेस नेत्यांनी कृषीमंत्र्यांना अक्षरशः घेरले. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी खतांच्या वाढलेल्या किंमतीवर बोट ठेवत धनंजय मुंडे यांच्याकडून उत्तराची अपेक्षा केली.
त्यावर धनंजय मुंडे यांनी खतांच्या किंमती वाढलेल्या नसून त्या स्थिर आहे, अशी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. त्यावर ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी त्यांच्या वाढलेल्या किमतीला केंद्र सरकार जबाबदार आहे हे कबूल करायला तुम्ही का घाबरता असा सवाल केला.
बोगस खते आणि बी बियाण्यांच्या मुद्द्यावरून काँग्रेस पक्षाच्या सहकाऱ्यांसह विधानसभेत आज प्रश्न उपस्थित केले. केंद्र सरकारकडून खतांच्या बाबतीत नफेखोरी सुरू आहे. वसुलीसाठी फिरणाऱ्या सरकारी टोळ्यांवर नेमकी काय कारवाई केली? मंत्र्यांनी सभागृहाला माहिती द्यावी अशी मागणी केली. pic.twitter.com/I2NttnJIti
— Balasaheb Thorat (@bb_thorat) July 19, 2023
थोरात यांनी, ‘बियाण्यांचा काळाबाजार होत असल्यामुळे आणि बाजारामध्ये मोठ्या प्रमाणावर बोगस बियाणे आल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे, हा मुद्दा सलग तिसऱ्या दिवशीही सभागृहात उपस्थित केला. ‘बोगस बियाण्यांवर कारवाईच्या नावाखाली ज्या सरकारी टोळ्या राज्यभर फिरत होत्या, ज्याच्यामध्ये काही मंत्र्यांचे स्वीय सहाय्यक सहभागी होते, त्या बोगस टोळ्यांवर सरकारने नेमकी काय कारवाई केली त्याची सभागृहाला माहिती द्यावी, असाही आग्रह कृषी मंत्र्यांकडे धरला.

