महाराष्ट्र संवाद न्यूज
अहमदनगर – अहमदनगर जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पर्जन्यमान झाल्यामुळे जनावरांच्या चाऱ्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेत पुढील दोन महिने जिल्ह्याबाहेर चारा वाहतुकीवर निर्बंध घालण्यात आले आहे. जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी हा निर्णय घेतला आहे.
हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांनी वर्तविलेल्या अंदाजानुसार दक्षिण पॅसिफिक महासागरातील अल-निनोचा देशातील मान्सून पर्जन्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. भंडारदरा निळवंडे मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील अपवाद वगळता जिल्ह्यात पावसाने सर्वत्र पाठ फिरविली आहे. कमी पर्जन्यमानामुळे जिल्ह्यात चाऱ्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता जिल्ह्यात उत्पादित होणारा चारा, मुरघास आणि टोटल मिक्स रेशन जिल्ह्याबाहेर वाहतूक करण्यास निर्बंध घालण्यात आले आहे.
गतवर्षीच्या पेरणी अहवालानुसार जिल्ह्यात 1 एप्रिल 2023 पासून 30,41,032 मॅट्रिक टन चारा शिल्लक असून तो अंदाजे पुढील 3.8 महिने पुरेल. त्यामुळे भविष्यात चाऱ्याच्या टंचाईचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतला आहे.
जिल्हाधिकारी सालीमठ यांनी या संदर्भात फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 नुसार प्राप्त अधिकाराचा वापर करत यासंबंधीचे आदेश काढले असून हे आदेश पुढील दोन महिन्याच्या कालावधीकरीता लागू राहणार आहे.

