महाराष्ट्र संवाद न्यूज
शिर्डी – बदली झालेल्या ठिकाणी हजर न होणाऱ्या महसूल विभागातील अधिकाऱ्यांवर आता कारवाई करून त्यांची सेवा खंडीत करण्यात येईल, अशी माहिती महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.
बदलीच्या ठिकाणी हजर न होणाऱ्या अधिकाऱ्यांची विभागाने घेतली दखल: स्थानिक प्रसार माध्यमांशी संवाद साधताना विखे पाटील म्हणाले, महसूल विभागातील बदल्यांची प्रक्रिया केव्हाच संपली आहे. त्यामुळे बदली झालेल्या ठिकाणी अनेक अधिकारी अद्याप हजर होत नसल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. याची गंभीर दखल आता महसूल विभागाने घेतली आहे. विदर्भ, मराठवाड्यातील ७० टक्के जागा यापूर्वी रिक्त होत्या, त्या सर्व जागांवर आता अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत.
अधिकाऱ्यांना दिल्या निलंबनाच्या नोटीस: परंतू काही ठिकाणी अधिकारी हजर होत नसल्याने अशा अधिकाऱ्यांना आता निलंबनाच्या नोटीसा देण्यात आल्या असून, त्यांच्या विभागीय चौकशा आणि सेवा खंडीत करण्याचा निर्णयही वेळप्रसंगी विभागाला घ्यावा लागेल, असेही त्यांनी सांगितले.
उंबरे घटने प्रकरणी पोलीस अधीक्षकांना चौकशीचे आदेश: राहुरी तालुक्यातील उंबरे येथील घटना अतिशय गंभीर असून याची संपूर्ण चौकशी करण्याचे आदेश जिल्हा पोलिस अधीक्षकांना दिले आहेत. याबाबतची संपूर्ण माहिती पुढे आणण्यासाठी पोलिस प्रशासन प्रयत्न करीत आहे. या घटनेतील दोषींवर कठोर कारवाई केली जाईल. यापूर्वी श्रीरामपूर तालुक्यात अशाच घटना घडल्या होत्या, त्यावेळी मोक्का कायद्यान्वये कारवाई करण्यात आली होती.
पोलीस अधिकाऱ्यावर होणार कारवाई: उंबरे येथील घटना पाहता ज्या पोलिस ठाण्याच्या हद्दीत अशा घटना घडतील तेथील पोलिस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचना यापूर्वीच दिल्या आहेत. परंतू समाजातील जबाबदार घटकांनीही पुढे येवून अशा प्रवृत्तीबद्दल पुढे येवून माहिती देण्याचे आवाहन महसूलमंत्री विखे पाटील यांनी केले आहे.

