असे काही घडले तरच महसूल सप्ताह खऱ्या अर्थाने साजरा होईल
महाराष्ट्र संवाद न्यूज
अहमदनगर – बुधवारी (ता. 2 ऑगस्ट) रात्री अकरा वाजता अहमदनगरचे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या मोबाईलची रिंग वाजते, मोबाईल उचलला जातो आणि समोरची व्यक्ती सावेडी परिसरातील आनंद नगर भागात राहत असलेल्या छबुबाई चित्रा कदम या 93 वर्षाच्या एकल महिलेला प्रशासनाकडून मदतीची गरज असल्याचे सांगते.
मोबाईल फोन नंतर काय घडते : जिल्हाधिकारी देखील तातडीने अन्नधान्य वितरण अधिकारी अर्चना पगारे व संजय गांधी निराधार योजनेचे तहसीलदार विशाल नाईकवाडी यांना फोन करून तातडीने मदतीच्या सूचना देतात. प्रशासनातील हे दोन्ही अधिकारी जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेची अंमलबजावणी करत एकल महिलेची संपर्क साधून तिला पिवळी शिधापत्रिका तातडीने मंजूर करत धान्य देण्याची व्यवस्था करतात. तर श्रावणबाळ वृद्धापकाळ योजनेतून दरमहा दीड हजार रुपयांचे वेतनही मंजूर करतात.
एकल महिलेला मदतीचा सुखद अनुभव : अहमदनगर जिल्ह्यात महसूलचे कामकाज नेहमीच वादाच्या भोवऱ्यात सापडत असले तरी देखील जिल्हाधिकाऱ्यांच्या रात्रीच्या मोबाईल संदेशावरून तातडीने प्रशासकीय सूत्रे फिरतात आणि एकल महिलेला शासकीय मदतीचा सुखद अनुभव मिळतो, त्यांच्या कर्तव्यदक्षतेचा अनुभव मिळतो तोही सध्या सुरू असलेल्या महसूल सप्ताहात. यामुळे प्रशासनातील हे अधिकारी निश्चितच अभिनंदनास पात्र ठरले आहे.
जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ म्हणाले : समाजात अनेक गरजू व्यक्ती, एकल महिला, विधवा, अपंग, निराधार आहेत या सर्वांना शासनाच्या योजनांचा लाभ देऊन त्यांचे जीवन सुकर करता येऊ शकते. समाजाप्रती आपले काही देणे लागते ही भावना मनी वृद्धिंगत करून सर्वसामान्यांची सेवा करण्याची संधी शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांना मिळते. या संधीचे सोने करत प्रत्येक शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांनी समाजातील गरजू व्यक्तीला शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून द्यावा, त्याचवेळी महसूल सप्ताह खऱ्या अर्थाने साजरा होईल.

