मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची राहणार उपस्थिती…
महाराष्ट्र संवाद न्यूज
अहमदनगर – ११ ऑगस्टला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिर्डीमध्ये ‘शासन आपल्या दारी’ हा शासनाचा महत्त्वकांक्षी उपक्रम होत आहे. पदाधिकारी, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी एकत्रित काम करत समन्वयातून हा उपक्रम यशस्वी करण्याचे आवाहन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मंगळवारी अहमदनगर येथील आढावा बैठकीत केले.
शासनाच्या विविध कल्याणकारी योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचाव्यात यासाठी शासन आपल्या दारी या कार्यक्रमाचे शिर्डी येथे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या पूर्वतयारीचा आढावा मंत्री विखे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात घेतला. यावेळी ते बोलत होते.
बैठकीसाठी हे होते उपस्थित: यावेळी आमदार संग्राम जगताप, माजी आमदार स्नेहलता कोल्हे, माजी आमदार वैभव पिचड, माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, महापालिकेचे आयुक्त डॉ. पंकज जावळे, अपर जिल्हाधिकारी सुहास मापारी, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील आदी उपस्थित होते.
लाभार्थ्यांसाठी ६०० पेक्षा अधिक एसटी बसेसची सुविधा: पालकमंत्री विखे पाटील म्हणाले, जिल्ह्यातील लाभार्थ्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ देण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत शिर्डी येथे भव्य अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ३० हजारापेक्षा अधिक लाभार्थ्यांची आसन व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली आहे. प्रत्येक तालुक्यातून लाभार्थ्यांना कार्यक्रमास येता यावे यासाठी ६०० पेक्षा अधिक एस.टी. महामंडळाच्या बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
नोडल समन्वयक, अधिकाऱ्यांनी तालुका स्तरावर बैठका घ्याव्या: प्रत्येक तालुक्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या नोडल व समन्वयक अधिकाऱ्यांनी गावनिहाय रूटप्लॅन, लाभार्थी वेळेत कार्यक्रमस्थळी पोहोचतील यादृष्टीने नियोजन करावे. कार्यक्रमास येणाऱ्या लाभार्थ्यांची संख्या अधिक असल्याने आरोग्याच्यादृष्टीने आरोग्य पथक, रुग्णवाहिका आदी व्यवस्था करण्यात यावी. तालुकास्तरावर नोडल व समन्वयक अधिकाऱ्यांनी पूर्वतयारी आढावा बैठकीचे आयोजन करण्याचे निर्देशही पालकमंत्र्यांनी दिले.
महसूल सप्ताहातून योजनांची माहिती जनसामान्यांपर्यंत: राज्यात पहिल्यांदाच महसूल दिनाऐवजी महसूल सप्ताहाचे आयोजन करण्यात येऊन शासनाच्या विविध योजनांची माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यात आली. विशेषतः महाविद्यालयातून कार्यक्रमांचे आयोजन करत योजनांची माहिती विध्यार्थ्यांमार्फत गावोगावी पोहोचविण्यात मोलाची मदत झाली. ‘सैनिक हो तुमच्यासाठी’ उपक्रमातुन माजी सैनिकांच्या समस्यांची सोडवणुक करण्यात यश आले. प्रशासनातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी केलेल्या या कामगिरीचे कौतुक पालकमंत्र्यांनी केले.
मेरी माटी मेरा देश: आपल्या मातीविषयी जनजागृती, प्रेम तसेच साक्षरता निर्माणासाठी देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मेरी माटी, मेरा देश उपक्रमाची घोषणा केली असून जिल्ह्यात हा उपक्रम अत्यंत उत्साहवर्धक वातावरणात साजरा करण्यासाठी काटेकोरपणे नियोजन करण्यात यावे. तसेच 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान “हर घर तिरंगा” हा उपक्रमही राबविण्यात येत असुन या उपक्रमांमध्ये जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकांने सहभाग घ्यावा, असे आवाहनही करण्यात आले.

