महाराष्ट्र संवाद न्यूज
अकोले – मातृभूमी विषयी कृतज्ञता आणि स्वातंत्र्यवीरांच्या योगदानाच्या स्मरण व्हावे यासाठी 9 ऑगस्ट पासून देशात “मेरी मिट्टी मेरा देश” हे अभियान सुरू होत आहे. अभियानांतर्गत जिल्ह्यात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती भाजपा उत्तर नगर जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे व अभियानाचे उत्तर नगर जिल्हा संयोजक भाऊसाहेब वाकचौरे पाटील यांनी दिली.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव उपक्रमानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी आमदार स्नेहलता कोल्हे, वैभव पिचड, बाळासाहेब मुरकुटे, शिर्डी लोकसभा प्रमुख राजेंद्र गोंदकर, लोकसभा प्रभारी नितीन दिनकर यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तर नगर जिल्ह्यात ग्रामपंचायत, तालुकास्तर, जिल्हास्तरावर लोकप्रतिनिधी, प्रशासन, लोकसहभागातून पंचप्रण प्रतिज्ञा, वसुधा वंदन, वीरों का वंदन यांसारखे उपक्रम तसेच गाव, पंचायत, गट, शहर, नगरपालिका क्षेत्रातील स्थानिक शूरवीरांच्या त्यागाला वंदन करणारे शिलाफलक किंवा स्मारक फलक शहरी आणि ग्रामीण भागात उभारले जाणार आहेत.
दिनांक 9 ते 30 ऑगस्ट दरम्यान, ‘मेरी मिट्टी-मेरा देश’ मोहिमेत गाव आणि गट स्तरावर स्थानिक स्वराज्य संस्था तसेच राज्यस्तरावरील कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. दिल्लीत ‘अमृत वाटिका’ तयार करण्यासाठी देशातुन 7500 कलशांमध्ये माती घेऊन ‘अमृत कलश यात्रा’ काढण्यात येणार असून ही ‘अमृत वाटिका’ ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ या वचनबद्धतेचे प्रतीक असणार आहे. माती किंवा दिवा हाती धरून काढलेला सेल्फी नागरिक संकेतस्थळावर अपलोड करू शकणार आहेत. या उपक्रमात सर्वांचा सक्रीय सहभाग आणि आपल्या देशाच्या वीरांप्रतीची कृतज्ञता प्रत्येकाने व्यक्त करावयाची आहे. 
ग्रामपंचायत स्तरावर 09 ते 14 ऑगस्ट दरम्यान एका दिवशी पाच उपक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. यामध्ये शिलाफलक, वीरांचा सन्मान, वसुधा वंदन (अमृत वाटिका), पंचप्रण शपथ, आणि ध्वजारोहण व राष्ट्रगीत यांचा समावेश आहे. शिलाफलक हा गावातील संस्मरणीय ठिकाण अमृत सरोवर, शाळा, ग्रामपंचायत उभारणी करण्यात येणार आहे. त्यावर स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा लोगो, प्रधानमंत्री यांचा व्हिजन 2047 संदेश, स्थानिक शहीद वीराची नावे, ग्रामपंचायत, शहराचे नाव दिनांक याबाबी नमुद केल्या जाणार आहेत. वीरांना वंदन व स्वातंत्र्य सैनिकांचा सत्कार करण्यात येणार आहे. हौतात्म्य पत्करलेल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या कुटुंबियांचा सत्कार, संरक्षण, केंद्रीय सशस्त्र पोलीस दल आणि राज्य पोलीस दलातील सेवानिवृत्त व्यक्तींचा सत्कार या उपक्रमाच्या माध्यमातून केला जाणार आहे.
वसुधावंदनमध्ये गावातील योग्य जागा निवडून 75 देशी वृक्षांच्या रोपांची लागवड करून अमृत वाटिका तयार करण्यात येणार आहे. वन विभागाच्या समन्वयातून स्थानिक पातळीवर ही रोपे उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
पंचप्रण (शपथ) देशाला विकसित बनवण्याचे स्वप्नं साकार करण्यासाठी ही प्रतिज्ञा घेतली जाणार आहे. विविध गावागावांतून वसुधा वंदन कार्यक्रमातून जमा केलेली एक मूठ माती कलशामध्ये गोळा केली जाणार आहे. या कलशावर तालुका, जिल्हा व राज्याचे नाव लिहून हा मातीचा कलश 27 ते 30 ऑगस्ट दरम्यान दिल्ली येथे नेला जाणार असून 30 ऑगस्टला मान्यवरांच्या उपस्थितीत अभियानाचा समारोप समारंभ होणार आहे.

